
एसटीची तीन वारकऱ्यांना धडक
मंचर, ता. ९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक बसली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून, दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. बोरगाव (ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) या गावातील हे तिघे वारकरी आहेत. दिलीप नामदेव सुतार (वय ६०), असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव असून, जयवंत मंडले (वय ४०) व वसंत विष्णू पाटील (वय ५०), हे दोघे जखमी
आहेत.
श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बोरगाव येथील २७ वारकरी खासगी जीप व टेम्पोतून जात होते. ते रात्री आळेफाटा येथे मुक्कामी थांबणार होते. तेथून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार होते. दरम्यान, एकलहरे येथे जुन्या रस्त्यावर लघुशंकेसाठी ते थांबले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या पुणे-अकोले एसटी बसची धडक बसल्याने तीन वारकरी रस्त्यावर कोसळले. त्यावेळी एकलहरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ लक्ष्मण सूर्यवंशी व इतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी मंचर पोलिसांकडे संपर्क केल्यानंतर पोलिस हवालदार नंदकुमार अढारी व योगेश रोडे ताबडतोब घटनास्थळी आले. त्यांनी रुग्णवाहिकेतून तिघांनाही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दिलीप सुतार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील कांबळे यांनी सांगितले. पांडुरंग मंडले व वसंत पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी एसटीचा चालक बाळासाहेब विलास धनवडे (रा. सावरगाव, ता. संगमनेर, जि. नगर) यांच्याकडे पोलिस अपघाताबाबत चौकशी करत आहेत.