
कांद्याला अनुदान देण्याची मागणी
मंचर, ता. ९ : कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्याने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या प्रती किलोला पाच रुपयापासून ते दहा रुपये बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्चही भागात नाही. राज्य सरकारने एप्रिल ते मे महिन्यात विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे, अशी मागणी आंबेगाव बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी केली.
ते म्हणाले, ‘‘कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत व शेतात बाराखी लाऊन कांदा साठवून ठेवला होता. पण, हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे कांदा सडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी काढला आहे.’’
बाजार समितीचे संचालक लक्ष्मण बाणखेले व राजेंद्र भंडारी यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत बँकांचे कर्जाचे हप्ते, वीजबिल, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी शुल्क व खरीप हंगामाची तयारी यासाठी पैशाची नितांत गरज असल्याने त्रस्त झालेले शेतकरी मिळेल त्या बाजारभावात कांदा विकत आहेत. शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यासाठी विक्री केलेल्या कांद्यावर अनुदान द्यावे.
कांद्याचे घाऊक व्यापारी श्यामराव टाव्हरे म्हणाले, ‘‘परदेशात महाराष्ट्रातील कांद्याला चांगली मागणी आहे. ‘नाफेड’मार्फत कांद्याची विक्री स्थानिक पातळीवर न करता कांदा निर्यात करावा. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढण्यास मदत होईल.’’