जातीपातीच्या दलदलीत माझा बळी गेला, रडणार नाही लढणार: आढळराव पाटील

जातीपातीच्या दलदलीत माझा बळी गेला, रडणार नाही लढणार: आढळराव पाटील

मंचर, ता. ८ : ‘‘सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मी पराभूत झालो. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. विद्यमान खासदारापेक्षा दीड हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला. घरदार सोडून सतत जनतेच्या कामासाठी संपर्क ठेवला. यावेळी यश मिळेल, अशी अपेक्षा होती. निकाल लागला, वाईट वाटले. जातीपातीच्या दलदलीत माझा बळी गेला. काम न करता व संपर्क न ठेवता निवडून येतात, ही लोकशाहीची चेष्टा आहे. पराभवाने खचून न जाता कामाचा वसा पुढे चालू ठेवणार आहे. रडायचे नाही लढायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करणार आहे,’’ अशी ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहविचार सभेत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी सहकारमंत्री वळसे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले, ‘‘आपल्यात राहून ज्यांनी विरोधी काम केले त्यांची नोंद वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांनी घ्यावी. यापुढे दगाफटका होऊ नये, याची आतापासूनच खबरदारी घ्यावी. कार्यकर्त्यांना कशी मदत करावी, याचे आदर्श उदाहरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. वळसे पाटील यांचा अपघात झाला नसता तर आंबेगावची परिस्थिती वेगळी असते. मी तुमच्याबरोबर मैदानात नाही, अशी खंत त्यांनी मला अनेक वेळा बोलून दाखवली. त्यांची होणारी तगमग मी जवळून पहिली आहे. ते मैदानात असते तर १५ ते २० हजाराचे मताधिक्य आंबेगावमधून वाढले असते.’’
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील व मी पुढाकार घेतला असून दिवसा थ्री फेज वीज कृषिपंपांना मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक लोक प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत.”
आमदार बेनके म्हणाले, ‘‘येत्या पावसाळी आधिवेशनात शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक निर्णय राज्य सरकार घेणार आहे. डिंभे धरणाला बोगदा पाडून शेतकऱ्यांचे पाणी पळविण्याचा डाव वळसे पाटील, आढळराव पाटील व मी हाणून पडणार आहे. त्यासाठी अजितदादा पवार छातीची ढाल करून उभे राहणार आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर कुठेही सत्कारासाठी गर्दी लोटली, असे पहावास मिळाले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व आमदार व कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. दिशाभूल करण्यासाठी सोशल मिडियावर खोट्या बातम्या फेरल्या जातात. आढळराव पाटील यांच्या झालेला पराभव हळहळ व्यक्त करणारा आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे."
अंकित जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com