

डी. के. वळसे पाटील
मंचर, ता.२४ : ‘‘आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला आठव्यांदा आमदार पदावर विराजमान केले आहे. यापुढे येत्या पाच वर्षांत शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी व युवक-युवतींना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ अशी ग्वाही आमदार दिलीप वळसे पाटील दिली व पुढील वर्षांतील विकासाचा अजेंडा ‘सकाळ’शी बोलताना मांडला.
आंबेगावच्या आदिवासी भागात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून दहावीपर्यंत निवासी आश्रमशाळा, विनामूल्य शिक्षण, भोजन, निवास सुविधा आहेत. मंचर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी वसतिगृहाची सोय, घोडेगाव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शांता शेळके नाट्यगृह, गोनवाडी येथे आय.टी.आय. प्रशिक्षण, जवळपास सर्व माध्यमिक शाळांना संगणक प्रयोगशाळा, घोडेगाव येथे न्यायालय इमारत, शासकीय कार्यालय इमारती, घोडेगाव व मंचर येथे पोलिस ठाणे, अधिकारी व कार्माचाऱ्यांसाठी निवासी इमारत, क्रीडा संकुल, मतदारसंघात अनेक गावात प्राथमिक आरोग्यकेंद्र, मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय, मोफत सी.टी.स्कॅन, डायलिसिस, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुविधा आहेत. तांबडेमळा येथे १०० बेडचे सामान्य रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे.
यावेळी वळसे पाटील यांनी पुढे सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या लढाईमध्ये राज्यातील दिग्गज विरोधकांचे आव्हान होतेच. साहेबांसोबत असल्याचा आव आणत काहीजण मिरवत होते. मात्र प्रत्यक्षात वेगळेच करत होते. आजच्या विजयाने त्यांचाही भांडाफोड झाला आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवाराने खालच्या पातळीवर टीका केली. त्यामध्ये राज्य पातळीवरील नेत्यांची भर पडली. माझ्या विरोधात केंद्रीय तपासयंत्रणांचा तपास सुरू आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाऊन महायुतीमध्ये वळसे पाटील सहभागी झाले. पण मी त्यांना आव्हान दिले की, मला केंद्रीय तपास यंत्रणांची नोटीस आल्याचे विरोधी उमेदवाराने दाखवावे. मी लगेच जाहीरसभा घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतो. मतदारांच्या लक्षात वस्तुस्थिती आली. यामुळे त्यांनी मला साथ दिली. डिंभे धरणाला बोगदा होणार नाही, असे विरोधक सांगत होते पण, त्यांच्याच पक्षाचे रोहित पवार व नीलेश लंके यांचे बोगदा होणार असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. महायुती घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम व मतदारांनी दिलेली साथ अविस्मरणीय आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
विकासाचा अजेंडा
१. शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने करणार
२. पांडवदरा पाझर तलाव, डिंभे धरणातून आदिवासी भागासाठी तीन शेती पाणीपुरवठा योजना राबविणार
३. कलमोडी धरणातून सातगावपठार भागाला पाणी, म्हाळसाकांत योजना, पाबळ-केंदूर भागातील बारा गावांसाठी पाणी व गाव तेथे अस्मिता भवन इमारत उभारणार
४. महिला व युवतींना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणार.
५. आदिवासी भागात स्ट्रॉबेरी लागवडीला प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
६. विद्यार्थांसाठी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्वस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार
७. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ व विश्वकर्मा योजनेअंतर्गत युवकांना उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण व अर्थसह्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.