मुर्टीकर चाखणार मनमुराद नैसर्गिक सेंद्रिय फळे

मुर्टीकर चाखणार मनमुराद नैसर्गिक सेंद्रिय फळे

Published on

मोरगाव, ता. २४ : वृक्षवल्ली आम्हा सोयरे... ग्रामीण मातीशी अतूट नाळ जोडलेल्या मुर्टी (ता. भोर) येथील युवकांच्या हरित ग्राम गावकऱ्यांच्या जिद्दीमुळे, फळझाडांची लागवड व संवर्धन यांच्या योग्य नियोजनामुळे येथील नागरिकांना मनमुराद नैसर्गिक सेंद्रिय फळे चाखता येणार आहेत.
युवकांनी वाढदिवसानिमित्त लावलेली जांभूळ, वड, पिंपळ, गुलमोहर, करंज, बकुळ, बांबू, सीताफळ अशी विविध झाडे बहरले आहेत. सध्या आंबा, चिंच, चिक्कू, पेरू, सीताफळ आदी फळांचा आस्वाद मुर्टीकर घेत आहेत. येथील उपसरपंच किरण जगदाळे व त्यांचे सहकारी मित्र यांनी २०२१ मध्ये निसर्गावर असणारे प्रेमापोटी विविध रोपांची लागवड करण्याचा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. जगदाळे यांनी स्वतः त्यांच्या वाढदिवसापासून झाडे लावण्याचा उपक्रमात सुरुवात केली. गावात ज्याचा वाढदिवस असेल त्याने अवास्तव कोणता खर्च न करता सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, घरासमोर, ओढ्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करायचे व वृक्ष संवर्धन करायचे असा निर्णय घेतला. युवकांच्या या छंदाला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला.

हिरवाईने नटलेले गाव ही मोठी नैसर्गिक संपत्ती असून त्यामुळे गावाचे नैसर्गिक सौंदर्य वाढले आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता, गटतट न पाहता वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण या उपक्रमात प्रत्येक जण आपली जन्मभूमी नैसर्गिक समृद्ध पर्यावरणाने नटली पाहिजे. या सकारात्मक विचाराने सहभागी होत आहे.
गावात जवळपास साडेतीन हजार झाडे लावली असून यापुढेही झाडे लावणे व त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन करणे हा उपक्रम सातत्याने सुरूच ठेवणार असल्याची माहिती येथील सरपंच कोमल जगताप व उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली.

कैऱ्या, चिकूच्या फळांनी बहरलेली झाडे
मुर्टीतील रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आंब्याची झाडे व चिकू फळांनी पूर्णपणे बहरले आहे. शेतकऱ्यांमधून अतिशय समाधान व्यक्त होत आहे. आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्या व चिकूची फळांनी बहरलेली झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे गावात फुलपाखरांचा वावर, पक्षांचा किलबिलाट, रानपाखरांचा थवा विहार करत असून गाव शंभर टक्के पर्यावरण समृद्ध ठेवण्याचा संकल्प मनोमन प्रत्येक नागरिक करत आहे.

झाडांना पाणी घालण्यासाठी बारमाही टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील काही जण सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या टँकरने या झाडांना पाणी घालून निसर्ग प्रेम जपत आहेत. त्यातून मिळणारे समाधान आणि आनंद हा अनमोल आहे.
- किरण जगदाळे, उपसरपंच


03528

Marathi News Esakal
www.esakal.com