दगडाचे ढिगारे टाकून वरंधा रस्ता बंद
हिर्डोशी, ता. २० : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी, सुरक्षिततेच्या कारणामुळे तसेच भोर हद्दीत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पुणे प्रशासनाच्या आदेशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत घाट जड वाहनांना, तर रेड व ऑरेंज अलर्ट काळात हलक्या वाहनांना बंद केला आहे. परंतु या आदेशाचे पालन न करता या मार्गावरून वाहतूक सुरू राहत असल्याने रायगड प्रशासनाकडून शुक्रवारी (ता. २०) दुपारी भोर-महाड रस्त्यावरील रायगड हद्दीत दगड मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद केला आहे. मात्र, यामुळे अडकून फसगत झालेल्या वाहनचालकांकडून दगड, माती बाजूला करून चारचाकी वाहनांपुरता मार्ग तयार केला व तात्पुरत्या स्वरूपात हलकी वाहने सायंकाळपर्यंत सुरू होती. अचानक दगडींचे ढिगारे टाकल्याचे कळताच नागरिकांकडून नाराजीचे सूर दिसून आले.
हलकी वाहने सुरू ठेवण्याची स्थानिकांची मागणी
वरंधा घाट सर्वच वाहनास बंद केल्यास हिर्डोशी परिसरातील देवघर, वेणुपुरी कोंढरी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, शिरगाव, शिळींब, आशिंपी, उंबर्डे, दुर्गाडी, अभेपुरी, चौधरीवाडी या गावातील नागरिकांची प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मुळातच या मार्गावरील एकमेव शिळींब मुक्कामी एसटी सोडली तर कोणतीही एसटी सुरू नाही. त्यामुळे गेले वर्षभर किंबहुना गेले अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक या मार्गावरून जाणाऱ्या खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत. परंतु आता रस्त्यावर दगडी टाकून घाट बंद केल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे हलक्या वाहनांसाठी घाट कायमस्वरूपी बंद करू नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रत्येकवेळी सुरक्षिततेच्या कारणासाठी हा घाट रस्ता गेले पाचसहा वर्षांपासून बंद केला जात आहे. घाट परिसरात असणाऱ्या उंबर्डे, अशिंपी, शिळींब, शिरगाव येथील नागरिक वरंध व बिरवाडी या महाड तालुक्यातील गावात दवाखाना, बाजारहाट, यासाठी सतत ये-जा करत असतात. तर उंबर्डे परीसरातील मुलं नजीक असल्याने घाटाखालील वरंध येथे शिक्षणासाठी जात आहेत. त्याचे आता नुकसान होणार आहे. तरी प्रशासनाने सर्व वाहनांसाठी रस्ता बंद करू नये.
- प्रकाश पवार, ग्रामस्थ, उंबर्डे
वरंधा घाट बंद करण्याचा प्रकार गेले पाचसहा वर्षांपासून सुरू आहे. यावर ठोस उपाययोजना न करता नुसते पत्र काढून लोकांची गैरसोय करणे एवढाच उद्देश यातून दिसत आहे. गेल्या पाचसहा वर्षात घाट सुरु राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत का? विशेष म्हणजे रस्ता रुंदीकरणाचे काम हिर्डोशी परिसरात सुरू आहे, घाटात नाही. घाटात रस्ता चांगला आहे. तरीही घाट बंद केला जातोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत मेल केला आहे. यावर विचार होऊन सर्वसामान्यांचा आर्थिक भुर्दंड व वेळ वाचण्यासाठी हलकी वाहने सुरू राहावीत.
- डॉ नितीन देशमुख, ग्रामस्थ, वरंध
भोर प्रशासनाकडून सूचनादर्शक फलक लावण्याची गरज
वाहनचालकांना घाट बंद असल्याचे समजण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कापुरहोळ, शिंदेवाडी (ता. खंडाळा) या भोरकडे येणाऱ्या फाट्यावर तसेच वरंधा घाटाकडे जाणाऱ्या भोर हद्दीत व नीरा देवघर धरणाजवळील निगुडघर येथे वाहनचालकांना सहज दिसेल असे घाट बंद असल्याबाबतचे सूचना फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहनचालकांचा हेलपाटा वाचून फसगत होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.