टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका

टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका

Published on

रवींद्र पाटे: सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. १: मुसळधार पावसामुळे टोमॅटोची फळे काळी पडली आहेत. तिरंगा रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उन्हाळी हंगाम वाया गेल्याने जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे टोमॅटो फळाला देठाजवळ चिरा पडल्या आहेत. टोमॅटोची फळे काळी पडली असून तिरंगा रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. विविध बुरशीजन्य, विषाणूजन्य रोगामुळे बागेतील सुमारे सत्तर टक्के फळे खराब झाली असून मुसळधार पावसामुळे टोमॅटोची पाने पिवळी पडली आहेत. यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली आहे. खरेदीनंतर टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी कडे पाठ फिरवली आहे. हीच परिस्थिती राज्यातील संगमनेर, पारनेर,नाशिक, बीड या भागातील टोमॅटो उत्पादकांची आहे.

जुन्नर,आंबेगाव तालुक्यात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात अथर्व, चॅम्प ३३,६२/४२, साहू, विरांग आदी विविध जातीच्या संकरित टोमॅटोची लागवड केली होती. टोमॅटोचे पीक चांगले यावे यासाठी शेण खतासह विविध रासायनिक व जिवाणूजन्य खतांचा वापर केला. टोमॅटो रोपांच्या पुनर्लागवडीनंतर उत्पादकांचा सुमारे दीड लाख रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे.


टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार शंभर रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान सुरुवातीला बाजारभाव मिळाला.दोन ते तीन तोडे सुरळीत झाल्यानंतर १२ मे ते २८ मे दरम्यान मुसळधार पाऊस झाला. सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण, पाऊस याचा प्रतिकूल परिणाम टोमॅटो बागेवर झाला असल्याचे दिसून आहे.

विषाणूजन्य, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
* खरडा
* चिरटा
* तिरंगा


शेतकरी उपाशी, विक्रेते तुपाशी
१. तोडणी झाल्यानंतर निवड करून ६० ते ७० टक्के खराब फळे द्यावी लागतात टाकून
२. टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर क्रेटला(२० किलोग्रॅम) पन्नास रुपये ते तीनशे रुपयांच्या दरम्यान मिळतो बाजारभाव
३. वाहतूक, तोडणी मजुरी, उत्पादन खर्च आदीचा विचार करता सध्याचा बाजार भाव उत्पादकांना परवडत नाही.
४. टोमॅटो बागांची सद्यःस्थिती पाहता पुढील एक ते दोन तोडे झाल्यानंतर टोमॅटोची बाग काढून टाकावी लागणार
५. खते, कीटकनाशके, मल्चिंग कागद, ठिबक व मंडप साहित्याचे भाव यंदा वाढले

तीन लाख रुपये खर्च करून दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. तोडणी सुरू झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे बागेतील ६० ते ७० टक्के टोमॅटोची फळे खराब झाली आहेत. टोमॅटोला प्रतिकिलोग्रॅम पाच ते दहा रुपये बाजारभाव मिळत आहे. यातून भांडवली खर्चही वसूल होत नाही.
- विलास काळे (टोमॅटो उत्पादक शेतकरी नारायणगाव)

शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केल्यानंतर वाहतुकीत टोमॅटो सडण्याचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. खरेदी टोमॅटोपैकी २५ टक्के टोमॅटो खराब होत आहेत. शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका बसला आहे.
- जालिंदर थोरवे, व्यापारी : टोमॅटो बाजार नारायणगाव

बेंगलोरला टोमॅटो हंगाम सुरू असल्याने इतर राज्यातील व्यापारी नारायणगाव बाजारात अद्याप खरेदीसाठी आले नाहीत. आंब्यापासून ज्यूस तयार करायचं काम सुरू असल्याने ज्यूस उत्पादकांनी टोमॅटो खरेदी बंद केली आहे. पुढील पंधरा दिवसांत राज्याच्या विविध भागातील व्यापारी नारायणगाव बाजारात दाखल होतील त्यानंतर बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.
- सारंग घोलप, संचालक : कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर

06679

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com