खड्डा पडल्याने बनेश्‍वरचा रस्त्यावर धोका

खड्डा पडल्याने बनेश्‍वरचा रस्त्यावर धोका

Published on

नसरापूर, ता.२६ : नसरापूर (ता. भोर) येथून बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठा खोल खड्डा पडला आहे. यामुळे प्रशासनाने धोकादायक बनलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविक, पर्यटकांना मंदिराकडे जाण्यासाठी केळवडे मार्गे जाण्याचे आवाहन केले आहे.
मंदिराकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता शिवगंगा नदी किनाऱ्यावरून जातो. नदीच्या बाजूने संरक्षक भिंत असून, ती व भिंतीलगतचा रस्ता नदीच्या बाजूला खचला आहे. गेले काही दिवसांपासून हा रस्ता हळूहळू खचत असून, आज (ता. २६) या रस्त्यावर खड्डा पडला. यामुळे रस्त्यामध्ये चीर पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धोकादायक झालेल्या या रस्त्यावरून बनेश्वरकडे जाणारे भाविक तसेच पर्यटकांची वाहने तसेच येथील अमृता विद्यालयाच्या स्कूल बस, केळवडे गावाकडे वळविण्यात आली. रस्ता सुरू ठेवल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेतली व याबाबत महसूल विभाग व जिल्हा परिषद प्रशासनास कळविले. यामुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता इक्बाल शेख, महसूलचे मंडलाधिकारी प्रदीपकुमार जावळे यांनी तातडीने रस्त्यास भेट दिली व त्यांनी रस्ता वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी नसरापूरचे ग्रामसेवक विजय कुलकर्णी, सदस्य सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झोरे, यशवंत कदम, महसुल कर्मचारी विजय गयावळ आदी उपस्थित होते.

अभियंता इक्बाल शेख यांनी पाहणी केल्यावर नदीच्या बाजूला हा रस्ता बऱ्याच प्रमाणात खचला असून, संरक्षक भिंतीला देखील अडव्या चिरा गेल्या असल्याने भिंती खालचा भाग खचत असल्याचे स्पष्ट केले. डांबरी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्ठ्याच्या भोवतालचा भागात देखील मोठ्या प्रमाणात भाग खाली जाण्याची शक्यता असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार असल्याचे ''सकाळ''ला सांगितले.
दरम्यान, मंदिराकडे जाण्यासाठी केळवडे मार्गाचा वापर करावा, असा फलक नसरापूर येथील रस्त्यावर लावण्यात आला आहे.


नदीकिनारच्या वस्तीला देखील धोका
नसरापूरमधील शिवगंगा नदीकिनारी असलेली मूळ गावठाण मेनआळी येथील घरांच्या मागील बाजूचा भाग देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. येथे तीव्र उतार निर्माण होऊन जमीन खचली आहे. या भागातील घरांना देखील तडे गेले आहेत. या धोकादायक भागाची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी केली. मंडलाधिकारी यांनी या घरांचा पंचनामा केला असून, वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली.

03445

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.