निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांना फटका

निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांना फटका

Published on

नसरापूर, ता. २४ : महाबिजच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकरी गटांना देण्यात आलेले परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निकृष्ट निघाले. यामुळे भोर तालुक्यातील २४ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बियाणांच्या ताटव्यांची वाढच न झाल्याने ज्वारी तर नाहीच शिवाय गुरांच्या चाऱ्यासाठीचा कडबा देखील उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी २८ हजार रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकरी करीत आहेत.

भोर तालुक्यातील २४ गावांमध्ये महाबिजने ज्वारी एकरी चार किलोप्रमाणे गटाच्या २५ शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. त्याची पेरणी साहाय्यक कृषी अधिकारी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी केली होती. या बियाणांची उगवण झाली परंतु दोन ते अडीच महिने झाले तरी त्या ज्वारीची अपेक्षीत वाढ झाली नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत तालुका कृषी विभाग व महाबिज यांच्याकडे तक्रार केली. रब्बीचा वाया गेलेला हंगाम, ज्वारी उत्पादन व जनावरांचा चारा याला फटका बसला आहे. त्यामुळे भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ज्वारीची अधारभूत किंमत तीन हजार ७४९ प्रतिक्विंटल आहे. कडब्याचा समावेश करून शेतकऱ्यांचे एकरी २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महाबिजच्या बियाणामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्याची तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाई देवी. अन्यथा शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल ,असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिला आहे.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्याशी निकृष्ट बियाणांबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परभणी शक्ती ज्वारी बियाणांची काही गावात योग्य वाढ न झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाऊस जास्त काळ राहिल्याने उशिरा पेरणी झाली व बियाणे उगवल्यावर त्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्याने वाढ खुंटली आहे. याबाबत महाबिजला कळवले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत कार्यवाही सुरू आहे.

परभणी शक्ती हे ज्वारीचे वाण बायोफोर्टीफाईड प्रमाणित व एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन देणारे वाण आहे. भोर व राजगड तालुक्यात मागील वर्षी देखील हे वाण दिले होते. आलेल्या तक्रारीनुसार आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता यावर्षीच्या जास्त पावसाने खोडकिडीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. बियाणांमध्ये दोष नाही परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत आमच्या अकोले येथील मुख्यालयात नुकसानीचा अहवाल पाठवला जाणार आहे.
- पुरुषोत्तम फाटे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार परभणी शक्ती या ज्वारी बियाणाची पेरणी केली. गेले दोन ते अडीच महिने झाले तरी पिकाची वाढ फक्त दोन फुटांपर्यंत झाली आहे. यामुळे ज्वारी उत्पादनाबरोबर गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महाबिज तसेच कृषी विभागाने या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी.
- दिनेश शिळीमकर, श्री म्हातोबा कृषी बचत गटाचे शेतकरी, कुरंगवडी (ता.भोर)


या गावांमध्ये अधिक नुकसान
चिखलगाव, वेनवडी, ससेवाडीस, कुरंगवडी, सांगवी बु., पांडे, राजापूर, सारोळा, वडगावडाळ, कर्णावड, कारी, वागजवाडी, केंजळ आदी गावामध्ये नुकसान झाले आहे.


06221

Marathi News Esakal
www.esakal.com