मेल्यावर ५० पिंजरे लावण्यापेक्षा जिवंतपणीच लावा

मेल्यावर ५० पिंजरे लावण्यापेक्षा जिवंतपणीच लावा

Published on

निरगुडसर, ता.१६ : राखणदार कुत्र्याला बिबट्याने शिकार करून उचलून नेले. परंतु कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार केल्याने बिबट्याला कुत्रे सोडून पळ काढावा लागला. ही घटना निरगुडसर येथील वळसेमळा येथे बुधवारी (ता.१५) नऊ वाजता घडली. निरगुडसर परिसरात आणखीन दोन ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ,त्यामुळे वनविभागाने मेल्यावर ५० पिंजरे लावण्यापेक्षा जिवंतपणीच दोन तीन पिंजरे लावावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निरगुडसर येथील वळसे मळ्यात कैलास दगडू वळसे यांच्या कुत्र्यावर बुधवारी रात्री नऊ वाजता बिबट्याने झडप मारली आणि उचलून नेले. परंतु कुत्र्याने जोरदार प्रतिकार केल्याने घराच्या काही अंतरावर बिबट्याला तोंडात धरलेला कुत्रा सोडून देण्याची वेळ आली. बिबट्याच्या हातून सुटताच कुत्र्याने धूम ठोकली आणि तो पसार झाला. निरगुडसर येथील भराडी फाट्यावर असलेल्या वस्तीवर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नह्यारमळा येथे सुनील भेके यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने पिंपळगाव - निरगुडसर रस्त्यावरून उसाच्या शेतात झेप मारली यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या थांबून राहिल्या, अशा परिस्थितीमुळे निरगुडसर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तरी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावे अशी मागणी कैलास वळसे व प्रवीण वळसे पाटील यांनी केली आहे.

बिबट्यामुळे दिवसाही खेळता येईना
बिबट्याच्या भीतीमुळे लहान मुलांना दिवसासुद्धा मोकळ्या वातावरणात खेळता येत नाही बागडता येत नाही. कधी बिबट्या कुठून येईल सांगता येणार नाही. त्यामुळे मुलांना बंद घरात राहावे लागत असून त्यांचा श्वास कोंडला आहे.

बळीराजा धास्तावला
रात्री सोडा दिवसा जीव मुठीत धरून शेतात काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कुत्र्यांपेक्षा बिबट्याची संख्या वाढली असून शेतकरी भयभीत आहेत. शेताला पाणी देता येत नाही,खुरपणी करता येत नाही,आदी लागवडी कामे वेळेवर करता येत नाही त्यामुळे सरकारने बिबट्या बाबत नवीन धोरण आणणे गरजेचे आहे.

सरकारने बिबट्याऐवजी माणसाला जपावे
मनुष्य आणि बिबट्या संघर्ष अधिक तीव्र झाला असून वनविभाग सांगतोय बिबट्याशी मैत्री करा, बिबट्या पूर्वी शेळी, मेंढी, वासरे यांच्यावर सर्रास हल्ला करत होता कुत्र्यावर हल्ला होतही नव्हता. आता सर्वत्र कुत्रांवर हल्ले होऊ लागले असून राखणदार कुत्रा गायब होऊ लागला आहे अशातच बिबट्या लहान मुलांवर हल्ला करू लागला असून हे भयानक चित्र समोर येत आहे त्यामुळे सरकारने बिबट्याऐवजी माणसाला जपावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com