

भीमाशंकर, ता. २० : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गावठाण स्थलांतरामुळे स्थानिक आदिवासींच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबत गुरुवारी (ता. १९) झालेल्या बैठकीत ग्रामस्थ व दुकानदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय हिले यांनी दिली.
यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रवी शिर्के, कैलास डामसे आदी दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
भीमाशंकर मंदिर परिसरातील नागरिकांचे कुंभमेळा व पर्यावरण संरक्षणाच्या कारणावरून स्थलांतर करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. मात्र, यामुळे पिढ्यानपिढ्या येथे व्यवसाय करणाऱ्या बेलफूल विक्रेते, डोलीवाले, मार्गदर्शक आणि छोट्या दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास आराखडा तयार करताना आदिवासी समाजाला केंद्रस्थानी ठेवले नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.
गावठाणातील घरांची नोंद असली तरी, पायरीमार्गावरील अनेक छोट्या व्यावसायिकांची अधिकृत नोंद नाही. त्यामुळे स्थलांतर झाल्यास या ६६ कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. प्रशासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा आणि पायरीमार्गावर दुकाने लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.