पोकळ आश्वासने करा कमी; रोजगाराची द्या हमी

पोकळ आश्वासने करा कमी; रोजगाराची द्या हमी

पिंपरी, ता.२ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. शहरातील गल्लीबोळांतही प्रचार सुरू आहे. यंदा सर्व पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचार करीत आहेत. पण सामान्य महिला मतदारांना कसा खासदार हवा आहे, याबाबत महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सामाजिक भान ठेऊन विकास साधताना पर्यावरणाचे रक्षण करणारा, बेरोजगारीचाही प्रश्‍न कमी होण्यासाठी महिला व तरुणांना लहान उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणारा, सुशिक्षित व महिलांचे प्रश्‍न सोडविणारा उमेदवार हवा आहे, अशा अपेक्षा गुरुवारी (ता. २) ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

‘पिंपरी-चिंचवड शहर शिक्षणाच्या बाबतीत अतिशय विकसित होताना दिसत आहे. दर्जेदार शिक्षणाच्या सोयी शहरात निर्माण होत आहे, याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु; विद्यार्थ्यांना राहण्यासाठीची चांगली वसतिगृहे आपल्या शहरात असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचाही प्रश्न सोडविले पाहिजेत. शहरात गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे दिले जाईल या प्रश्नांमध्येही लक्ष घालणारा खासदार असावा.’
- शारदा साबळे, मुख्याध्यापिका, निगडी

‘निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा आपल्या लोकसभा मतदारसंघात किती जोमाने काम करू शकतो, आपल्या मतदारसंघाचे किती प्रश्न तो लोकसभेत मांडू शकतो, हे महत्त्वाचे आहे. नाही तर पक्ष आणि राजकीय ताकदीवर कोणीही खासदार होते आणि लोकसभेच्या खुर्च्या अडवितात. उमेदवार किती शिक्षित आहे, त्याला भारतीय संविधानाची कितपत माहिती आहे तसेच मतदारसंघातील किती प्रश्न त्याला माहीत आहेत, या सर्व बाबी लक्षात घेणे खूप महत्त्वाचा आहे. हे सर्व ज्ञान असलेला खासदार असला पाहिजे.’
- सुवर्णा खेडकर, गृहिणी, चिखली

‘दैनंदिन जीवन जगत असताना वाढत्या महागाईला तोंड देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गोरगरिबांच्या आवाक्यात राहतील तसेच त्यांचे महिनाभराचे बजेट बिघडणार नाही, या पद्धतीने देशामध्ये महागाई कमी करण्यासाठीचे प्रश्न मांडणारा खासदार असावा. शहरामधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही अतिशय गंभीर होत चाललेला आहे. या प्रश्नाकडे सुद्धा डोळसपणे पाहणाऱ्या खासदाराची शहराला आवश्यकता आहे.’
- शीतल पाटील, गृहिणी, जुनी सांगवी

जनतेशी नाळ जुळलेली असावी. निवडून आल्यावर पाच वर्ष मतदारसंघात काम केले पाहिजे. जनतेची कामे केली पाहिजेत. केंद्राशी निगडित असलेले मतदार संघातील प्रश्न सोडविले पाहिजे, केवळ बोलबच्चनगिरी नको. शेतकऱ्याची महिलांची व गोरगरिबांची प्रश्न सोडविणारा खासदार असावा.
- सरिता नेवाळे, गृहिणी, संभाजीनगर

भावी पिढीतील जनसामान्य लोकांपर्यंत आरोग्याचा विकास पोहोचविणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या आरोग्याचा विचार झाला पाहिजे. भेसळयुक्त अन्न धान्य, औषधे रोखणारा, आरोग्यदायी व सुदृढ भारताचे स्वप्न साकार करणारा खासदार असावा.’
- डॉ. रंजना जायभाय, चिंचवडगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com