जिल्हा परिषद मिटविणार चाऱ्याचा प्रश्न
पुणे, ता. ७ : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. याचा फटका शेतीला बसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना दर्जेदार चारा निर्मितीसाठी बियाणे वाटप करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडून ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर पुढील काही महिन्यांमध्ये चारा टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य कार्यक्रमाअंतर्गत बियाणे वाटप केले जाणार आहे. दुधाळ जनावरांना पुरेशा प्रमाणात आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देऊन दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी हे चारा बियाणे वाटप महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्या भागातील शेतकऱ्यांच्या जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याचा अंदाज आहे. सध्या या शेतकऱ्यांना जनावरांसाठी इतर ठिकाणांहून चाऱ्याची व्यवस्था करावी लागत आहे. याबाबत दौंडमधील नानगावचे किरण फडतरे म्हणाले, ‘‘पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झालेच, पण त्याबरोबर जनावरांचा चाराही गेला. सध्या जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे खर्च करण्याची वेळ येत आहे. जिल्हा परिषदेकडे बियाण्याची मागणी करणार आहे.’’
पुढील काही महिन्यांमध्ये चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. महामंडळाकडून खरेदी केलेले बियाणे एका शेतकऱ्याला चार हजार रुपये किमतीचे बियाणे देण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत असून, आत्तापर्यंत चौदाशे शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत.
- विष्णू गर्जे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
दृष्टीक्षेपात
- शेतकऱ्यांना बियाण्यासाठी https://zppunecessyojana.com या संकेतस्थळावर अर्ज करावा
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत
- लाभार्थ्यांकडे भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंद असलेली किमान तीन ते चार जनावरे असणे आवश्यक.
- वैरण लागवडीसाठी स्वतःची शेतजमीन आणि सिंचनाची सुविधा
- सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
हे बियाणे असणार...
या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यास एक हेक्टर क्षेत्रात वैरण उत्पादनासाठी १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपयांपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ज्वारी, मका, बाजरी, बरसीम (गोडघास), लसूणघास, न्युट्रीफिड, नेपिअर तसेच इतर गवत प्रजातींचा यात समावेश असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.