संतविचार, राष्ट्रभावना विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा निर्धार
आळंदी, ता. २८ : ‘‘महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. संत, महामानव आणि राष्ट्र सुधारक यांच्या जीवन प्रवासातून त्यांनी रुजवलेली राष्ट्रभावनेची जीवनमूल्ये आणि त्याग समर्पण समता राष्ट्रभक्ती यांचे सुसंगत मांडणी भावी पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून दिली तर सुसंस्कृत राष्ट्राबरोबरच माणूस घडवण्याचे साधन संत साहित्याच्या शिकवणीतून निश्चित घडेल. हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्यातील व्याख्याते, कीर्तनकार शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत संतांची शिकवण, नैतिक जबाबदारी आणि राष्ट्रभावनेचे संस्कार पोहोचविणार आहेत. त्या उपक्रमांचा राबविण्याचा निर्धार आळंदीत करण्यात आला.
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील प्रेरणादायी कीर्तनकार वक्त्यांची कार्यशाळा आळंदी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. वारकऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण उपक्रमास पुढे नेण्यासाठी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. अखिल वारकरी गुरुकुल संघ तसेच वारकरी शिक्षण संस्थांचे अध्यापक आणि कीर्तनकार उपस्थित होते. कार्यशाळेत वारकरी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ‘राष्ट्रनिर्मितीची संस्कारमूल्ये’ या अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थिती त्यांना एक एक प्रत वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना व वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षण मुलांना देणे ही कामी संत साहित्य आणि संविधानिक मूल्यांचा शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी मोठे योगदान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमातील समावेश महत्त्वपूर्ण काम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाविषयी जागरूकता निर्माण होऊन जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ होणार आहे.’’ सूत्रसंचालन उमेश महाराज बागडे यांनी केले. आभार किशोर महाराज धुमाळ यांनी केले.
आळंदी : राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम प्रेरणादायी व त्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ‘राष्ट्रनिर्मितीची संस्कारमूल्ये’ या अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

