चिंबळी फाटा- बर्गे वस्ती दररोज कोंडी

चिंबळी फाटा- बर्गे वस्ती दररोज कोंडी

Published on

हरिदास कड : सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. ८ : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा ते चिंबळी फाटा या सुमारे दीड किलोमीटर अंतरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे उद्योजक, व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, डॉक्टर असे सारेच वैतागले आहेत. याकडे राजकीय नेते, पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी या सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांत जास्त वाहतूक कोंडी कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोई फाटा, चिंबळी फाटा या ठिकाणी होते. एक ते दीड किलोमीटर जाण्यासाठी साधारणपणे एक ते दोन तास जातात. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होते. यात रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, पोलिसांची वाहनेही अडकतात. या कोंडीचे गांभीर्य कोणालाच नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. या मार्गाने राजकीय नेते, मंत्री, अधिकारी ये-जा करतात. तरीही कोंडी सुटत नाही. वाहतूक पोलिस असतात, तेव्हा वाहने कशीबशी सुरळीत जातात. पण, ती तेवढ्यापुरतीच. पण, त्यानंतर पुन्हा कोंडी होते आणि नागरिकांची घुसमट होते.

वाहतूक कोंडीची कारणे
- पुणे-नाशिक महामार्ग अरुंद आहे, सेवा रस्ता नाही
- महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे
- औद्योगिक परिसर व खासगी मालकांची गोदामे असल्याने अवजड वाहनांची संख्या अधिक
- कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोईफाटा, चिंबळी फाटा परिसरांतील कंपन्यांकडे वाहने वळताना कोंडी होते
- महामार्गाच्या साइडपट्ट्या पूर्णपणे खचल्या, उखडलेल्या आहेत
- महामार्गाच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा
- विरुद्ध दिशेने येणारे व पुढे जाण्याच्या प्रयत्नात ‘लेन कटिंग’ करणाऱ्या बेशिस्तांमुळे कोंडीत भर
- स्वतंत्र पदपथ नसल्याने पादचाऱ्यांचा ये-जा रस्त्यांवरून
- महामार्ग रुंदीकरणाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष
- चुकीच्या पद्धतीने दुभाजक फोडून मार्ग केल्याने कोंडी

पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गाचे काम प्रलंबित आहे. मार्ग अरुंद आहे. संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, महाळुंगे वाहतूक विभाग

10251


वाहनचालकांचे मते, ‘५ सेकंद’;
पोलिस म्हणतात, ‘१५ सेकंद’

चाकणच्या तळेगाव चौकातील सिग्नलबाबत संभ्रम

चाकण : पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव- शिक्रापूर महामार्ग मिळणाऱ्या चाकण येथील तळेगाव चौकात सतत वाहतूक कोंडी होते. तळेगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अवघ्या पाच सेकंदांचा हिरवा सिग्नल दिल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, ‘‘तळेगाव बाजूकडे अवजड वाहनांना माणिक चौकातून बंदी आहे. त्यामुळे फक्त दुचाकी व इतर वाहनांसाठी हिरवा सिग्नल आहे. तो पंधरा सेकंदाचा आहे.’’ हा कालावधी खूपच कमी ठरत. त्यामुळे वाहनचालकांनी नेमके करायचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जागतिक पातळीवर औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या चाकणमध्ये रोज लाखो हलकी, अवजड वाहने तळेगाव चौकातून ये-जा करतात. मात्र, सिग्नलचा हिरवा दिवा केवळ काही सेकंदांसाठी लागल्याने वाहनचालकांना चौक ओलांडणे कठीण होत आहे. दिवा बंद झाल्यानंतर वाहन चालकांना पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. वाहन चालकांच्या मते, ‘‘हिरवा दिवा फक्त पाच सेकंदाचा आहे.’’ तर, पोलिसांच्या मते, ‘‘हिरवा दिवा पंधरा सेकंदाचा आहे.’’ पण, या गोंधळामुळे कोंडीत भर पडत आहे.

वाहनचालक म्हणतात...
‘‘हिरवा दिव्याचे सेकंद कमी आहेत. वाहनांची गर्दी असल्याने इतक्या कमी वेळेत चौकातून काही वाहनेच पुढे जाऊ शकतात. परिणामी, मागे रांगा लागतात आणि कोंडी वाढते. काही वाहनचालक घाईघाईत सिग्नल तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात घाईत सिग्नल तोडल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. अनेक अपघात सातत्याने येथे झाले आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी वाहनांची वर्दळ असताना परिस्थिती अधिक गंभीर बनते.’’

वाहतूक तज्ज्ञांच्या मते...
‘‘नेहमी वर्दळ असलेल्या चौकांमध्ये सिग्नलची वेळ वाहतुकीच्या प्रमाणानुसार निश्चित केली पाहिजे. कमी सेकंदांचा कालावधी हा अत्यंत अपुरा आहे. किमान ३० सेकंदांचा हिरवा सिग्नल आवश्यक आहे. तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन, लेन शिस्त, वाहतूक पोलिसांची उपस्थिती, यामुळे कोंडी कमी होऊ शकते. तळेगाव चौकातील हिरवा दिव्याची वेळ वाढविण्याची पोलिसांकडे अनेकांनी मागणी केली आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर पाहणी करून सिग्नलच्या वेळेत बदल करावा,’’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केली आहे.

तळेगाव चौकात तळेगाव बाजूकडे जाणारा हिरवा सिग्नल १५ सेकंदांचा आहे. कारण माणिक चौकातून तळेगाव चौकापर्यंत येणारा चाकण- शिक्रापूर मार्ग एकेरी केलेला आहे. तसेच चाकण-तळेगाव मार्गही महाळुंगे गावापर्यंत एकेरी केलेला आहे. त्यामुळे हा सिग्नल कमी सेकंदाचा ठेवलेला आहे. तळेगाव चौकात दुचाकींची संख्या अधिक असते. ते लवकर निघून जातात. एकेरी मार्गामुळे अन्य वाहने कमी असतात. त्यामुळे हिरवा दिवा कमी वेळेचा आहे.
- नामदेव गाडे, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com