उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचा अपमान

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचा अपमान

राजगुरुनगर, ता. ६ : ‘‘उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी खोटे बोलून भाजपबरोबरची नैसर्गिक युती तोडली आणि शिवसेनेचा व शिवसैनिकांचा अपमान केला म्हणून ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ ही म्हण आपल्याला खरी करून दाखवायची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यासाठी आणि दीड वर्षातील लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे,’’ असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ राजगुरुनगर येथे शनिवारी (ता. ६) येथून झाला. त्यावेळी पुणे- नाशिक महामार्गावरील नवीन खेड घाटाच्या पायथ्याशी पानमळा (सांडभोरवाडी) येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेच्या प्रवक्त्या मीना कांबळी, शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख अशोक भुजबळ, नितीन गोरे, राजेश जवळेकर, रवींद्र करंजखेले, विजयसिंह शिंदे, अरुण गिरे, महेश शेवकरी, ज्योती अरगडे, नयना झनकर आदी उपस्थित होते. योगिता पाचारणे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान पोखरकर यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मला पदाचा मोह नव्हता, पण शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आणि शिवसेना वाचविण्यासाठी दीड वर्षांपूर्वी भूमिका घेतली. बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी, मंत्रिपदावर लाथ मारून माझ्याबरोबर सात- आठ मंत्री आले. लोकांच्या भल्यासाठी सत्ता सोडण्याचे काम आम्ही केले. बंड करायचे असते तर २०१९ मध्येच केले असते. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची जनतेसाठी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण आम्हाला असल्याने आम्ही धाडसाने निर्णय घेतला. दीड वर्षातील कामामुळे जो निर्णय घेतला, त्यामागचे सत्य कार्यकर्त्यांना पटू लागले आहे.’’

‘‘बाळासाहेबांनी १९९५ मध्ये एका सहकाऱ्याला मुख्यमंत्री केले. एकजण मात्र, ‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू,’ असे म्हणत होते. पण, वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले. त्यातून त्यांनी काय कमावले आणि काय गमावले, याचे आत्मचिंतन करावे. आम्ही शेताबांधावर लोकांपर्यंत जाऊन लोकनिर्णय घेत आहोत‌. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आम्ही नाही,’’ असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. महाराष्ट्राच्या सर्व प्रस्तावांना केंद्र सरकार मंजुरी देत आहे‌. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्याची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर होती. मध्यंतरीच्या अडीच वर्षांत ती तिसऱ्या क्रमांकावर गेली. मात्र, गेल्या दीड वर्षातील कामामुळे ती पुन्हा पहिल्या क्रमांकावर आली आहे. जीडीपी पुढे गेला आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन झाले आहे. पंतप्रधानांना देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनवर न्यायची आहे. त्यात तर १ ट्रिलियनचे योगदान महाराष्ट्राला द्यायचे आहे. शाश्वत आणि न्याय देणारा विकास करायचा आहे,’’ असे मुख्यमंत्री शिंदे सांगितले‌.
‘‘खेड पंचायत समिती इमारत, संभाजी महाराज स्मारकाचा ४०० कोटींचा आराखडा, बिबट सफारीला ८० कोटींची मंजुरी, पुणे- नाशिक रेल्वेचा पंधरा वर्षे पाठपुरावा, पुणे- नाशिक महामार्ग रुंदीकरण व बाह्यवळणे, तळेगाव- शिक्रापूर रस्ता मंजुरी, अशी अनेक कामे मार्गी लावली. माझ्या पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा योजनांसाठी चाकणला १७० कोटी, शिरूरला ७० कोटी व मंचरला ३० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले,’’ असे आढळराव पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातून मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या ४५ जागांपेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा संकल्प करा. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यांना दुसरे काम नाही‌. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे त्यांच्याविषयी खूप मुद्दे आहेत. बोललो तर पळता भुई थोडी होईल‌‌. कोरोनात मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकवावे? आम्ही बोललो तर तोंड दाखवायला जागा सापडणार नाही.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही’
‘‘शिरूर मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे २०१९ मध्ये पराभव होऊनही थांबलो नाही. पद नसतानाही जनतेला आधार देण्यासाठी आणि शिरूरला नवचैतन्य आणण्यासाठी; प्रपंच, व्यवसाय आणि तब्येतीची पर्वा न करता वणवण फिरत आहे‌. शिरूरच्या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य राहील. खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही,’’ असा टोला आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नाव न घेता लगावला.

राजगुरुनगर (ता. खेड) : शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com