खेडमध्ये ‘लुटारू दुल्हन’
राजगुरुनगर, ता. १३ : खेड तालुक्यातील जैदवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाशी १ लाख ६० हजार रुपये घेऊन लग्न केले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पळून गेल्याची घटना नुकतीच येथे घडली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैदवाडी येथील तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेती करणाऱ्या मुलाचे लग्न मराठवाड्यातील मुलीशी त्यांच्या ओळखीच्या ज्योती संतोष तांबोळी (वय ४०, रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर) या महिलेच्या मध्यस्थीने ठरले. सुवर्णा उत्तम गव्हाणे (वय २८, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे नाव सांगण्यात आलेल्या मुलीबरोबर हे लग्न ठरले. त्या मोबदल्यात मध्यस्थी ज्योती तांबोळी, मुलगी सुवर्णा गव्हाणे, तसेच सुवर्णाची मामी अनुसया राजेंद्र मोरे (वय ५०, रा. उमरगा) आणि मावशी मनीषा बाळू कदम (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, निलंगा, जि. लातूर) यांनी संगनमत करून फिर्यादीकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले. इतरही खर्च मुलाकडच्यांनी केला. त्यानंतर घाईगडबडीत लग्न लावण्यात आले. लग्नानंतर नवरीची कथित मामी आणि मावशी तिच्याबरोबर जैदवाडी येथेच थांबल्या. दुसऱ्या दिवशी परगावी नातेवाइकांकडे मयत झाले. तो अंत्यविधी उशिरा झाल्याने जैद कुटुंबीय तो उरकून रात्री बाराच्या सुमारास घरी येऊन झोपले. आधी लग्न आणि नंतर या गडबडीमुळे सर्वजण गाढ झोपी गेले. ती संधी साधून रात्री दोनच्या सुमारास नवरी आणि बरोबरच्या दोन महिलांनी मागच्या दरवाजातून पोबारा केला. ही घटना २२ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. काही शोध तपास लागेना म्हणून शेवटी पोलिसांत फिर्याद देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.