शेतकऱ्यांना वीजबिल माफीसाठी 
भरणे यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांना वीजबिल माफीसाठी भरणे यांचा आंदोलनाचा इशारा

Published on

इंदापूर, ता. ९ : कोरोना महामारीमुळे सलग २-३ वर्षे राज्य सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारली असून, राज्य सरकारचे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती न करता संपूर्ण वीजबिल माफ करावे. त्याचप्रमाणे चालू बिलात हफ्ते निर्धारित करून द्यावेत; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी निवेदनामध्ये आमदार भरणे म्हणाले की, विरोधी बाकावर असताना भाजपवाल्यांनी वीजबिल माफीसाठी आंदोलनांची नौटंकी केली होती. मात्र, हीच मंडळी आता सत्तेत आहेत. परंतु, सत्तेत येताच त्यांनी शेतकऱ्यांवर आसूड उगरायला सुरवात केली आहे. सध्या तालुक्यातील गहू, ज्वारी, मका, तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू या सारखी पिके अजूनही शिवारातच आहेत.‌ त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसबिलांची अजून काही कारखान्यांनी दमडीही दिली नसल्याचे शेतकरी वर्ग पुरता अडचणीत आलेला आहे. एकतर शेतमालाला योग्य बाजारभाव नाही, सोबती कधी अवकाळीसारखी अस्मानी संकटे घोंघावत आहेत. त्याच सततच्या वाढत्या महागाईने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असताना हे शेतकरी विरोधी सरकार वीजबिल वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन वीज कनेक्शन तोडत आहेत. वास्तविक पाहता सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वीजबिलासाठी तगादा न लावता वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देऊ नयेत, अन्यथा या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सबंध तालुकाभर तीव्र आंदोलने छेडण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.