थकबाकीसाठी ग्रामपंचायतींना ५० टक्के करसवलत

थकबाकीसाठी ग्रामपंचायतींना ५० टक्के करसवलत

Published on

सोमेश्वरनगर, ता. १४ : कोरोनाकाळापासून ग्रामपंचायतींच्या करवसुलीला जोरदार ‘ब्रेक’ लागला आणि थकबाकीत प्रचंड वाढ झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या मालमत्ता कर व अन्यकरांच्या रकमेत ५० टक्क्यांची भरघोस सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे. ग्रामपंचायतींसाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला असून विशेष ग्रामसभा आयोजित करूनच ही सवलत देता येणार आहे.
ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानांतर्गत निवासी मालमत्ता कर व अन्य करांच्या थकबाकीमध्ये वसुलीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. घर वा आनुषंगिक मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी, दिवाबत्ती आदी करांमध्ये बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत थकबाकी आहे. थकबाकी कर वसुलीला गती देण्यासाठी आणि ग्रामपंचायतींच्या विकासाला गती देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. दरम्यान, ही योजना ग्रामपंचायतींसाठी ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. कारण बुडणाऱ्या रकमेची सरकारकडून कसलीही भरपाई मिळणार नाही. आपली थकबाकी, सवलत देण्याची क्षमता विचारात घेऊन ग्रामपंचायतींना निर्णय घ्यावा लागणार आहे. या निर्णयासाठी विशेष ग्रामसभा बोलावून बहुमताने ठराव मंजूर करावा लागणार आहे.

दृष्टिक्षेपात
या योजनेत मालमत्ता व अन्य करांची चालू वर्षाची (२०२५-२६) पूर्ण रक्कम भरावी लागणार
१ एप्रिल २०२५ पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या ५० टक्के रक्कम ग्रामस्थांनी भरावी लागणार आहे. त्यानंतरच ५० टक्के रकमेची सवलत मिळू शकणार
योजना चालू वर्षापुरतीच
औद्योगिक व व्यवसायिककरांसाठी; मात्र कुठलीही सवलत देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना नाही
नियमित करभरणा करणाऱ्यांचा कुठलाही विचार केला गेला नाही.

कोरोनाकाळानंतर थकबाकीचा फुगवटा वाढला. सुमारे अडीच कोटींच्या आसपास आमची थकबाकी आहे. त्यामुळे असंख्य अडचणी येतात. तालुका व जिल्हा प्रशासनाला आम्ही सवलत योजना राबविण्याची परवानगी आधीच मागत होतो. त्यामुळे या योजनेचे निश्चित स्वागत आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ग्रामसभा घेऊ.
- राजेश काकडे, उपसरपंच, नीरा (ता. पुरंदर)

कर थकबाकी वाढून दोन वेळा लोकअदालतीत विषय गेला होता. न्यायालयीन तडजोडीऐवजी राज्यसरकाराने काढलेली सवलत योजना चांगली असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच नियमित भरणा करणाऱ्यांचाही विचार व्हायला हवा होता.
- पूजा गायकवाड, सरपंच, करंजेपूल (ता. बारामती)

ग्रामपंचायत उत्पन्नात घट होणार असली तरी वर्षानुवर्षे थकबाकी पडून राहण्यापेक्षा करसवलत योग्य ठरेल. यासाठी आम्ही तातडीने १९ नोव्हेंबरलाच ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
- हेमंत गायकवाड, सरपंच, वाघळवाडी (ता. बारामती)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com