घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. १४ : उज्ज्वल भवितव्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदींच्या हाती देण्यासाठीचे आवाहन... ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संघर्षाला पाठिंब्यासाठीची साद...शेती आणि शेतकरी वर्गाच्या झालेल्या वाताहातीचा संताप...देशाची सुरक्षा आणि सर्वांगिण विकासासाठीचा अजेंडा...शिरूर लोकसभा मतदार संघासाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर कुणाची सरशी होणार आणि कोण तोंडघशी पडणार याबाबत, आपापले मुद्दे प्रभावीपणे मांडून आडाखे बांधले जात आहेत. मतदार हुशार असल्याने भल्याभल्यांचे अंदाज चुकणार असून, ‘घड्याळ चालणार की तुतारी वाजणार’ अशा चर्चांनी जोर धरला आहे.

शिरूर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी- माजी खासदारांत प्रत्यक्षात कॉंटे की टक्कर झाली असली तरी ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदार संघात पारंपारिक लढतीत प्रचारापासून सुरू झालेली चुरस मतदानापर्यंत कायम राहिली. उमेदवारी, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानातील चुरशीमुळे विजयाचा कौल कुणाला मिळणार, याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकलेला नाही. या अनुभवी उमेदवारांत कोण बाजी मारणार, याबाबत वेगवेगळे तर्क- वितर्क लढविले जात आहेत. दोन्ही बाजूचे उमेदवार, स्थानिक नेते, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या विजयाचा दावा करीत असले तरी राजकीय तज्ज्ञ आणि निवडणुकांतील धुरीण मात्र ठामठोक बोलायला तयार नाहीत. शिरूरसह, आंबेगाव, खेड, जुन्नर हे ग्रामीण तर हडपसर व भोसरी या शहरी भागाचा समावेश असलेल्या या संमिश्र जनभावनेच्या मतदार संघातील निकालाचा अंदाज बांधणे बहुतेकांना कठीण जात आहे.
घसरलेला मताचा टक्का कुणाला तारणार आणि कुणाला बाधणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. कमी मतदान हे शक्यतो प्रस्थापितांना धोक्याचा इशारा मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात ही संज्ञा कुणाला लागू पडते, यावर या कमी मतदानाची साधक- बाधकता अवलंबून आहे. दुपारच्या वेळी जाणवणारे ऊन आणि सायंकाळी पाचच्या पुढे मतदार संघात सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसानेही मतदानावर परिणाम झाला. दुपारपासूनच्या उन्हामुळे पाचनंतर मतदानात मोठी भर पडण्याचे अंदाज बांधले जात होते. तथापि, पावसामुळे न झालेले अंदाजे दहा ते बारा टक्के मतदान महत्त्वपूर्ण असून, ते घड्याळाचे काटे बंद पाडणारे ठरणार की तुतारीचा आवाज क्षीण करणार, याकडे नजरा लागल्या आहेत. कमी मतदानाबाबत नेहमीचे निकष न लावता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कुणाला बसणार, यावरही आडाखे बांधले जात आहेत.
गतवेळच्या निवडणुकीत शहरी भागातून आढळराव पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला होता, तर ग्रामीण भागाने डॉ. कोल्हे यांना उत्स्फूर्तपणे उचलून धरले होते. गतवेळच्या निवडणुकीत ६०.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ५४.१६ वर येऊन ते थांबले. मतांचा टक्का घसरला असला तरी मतदारसंख्येतील निर्णायक वाढ आणि नवमतदारांनी आपल्या पसंतीची माळ कुणाच्या गळ्यात घातली यावर निकाल ठरणार आहे.

पवार विरूद्ध मोदी
ग्रामीण भागातील शरद पवार यांचा करिष्मा कायम असला तरी शहरी भागातून उमटणाऱ्या ‘मोदी-मोदी’च्या ललकाऱ्या त्यांच्या विरोधकांना सावधगिरीच्या सूचना देत होत्या. ग्रामीण भागातील साधा, अशिक्षित आणि कुठलाही स्वार्थ नसलेला माणूस निरपेक्ष भावनेने शरद पवार यांच्याविषयी भरभरून बोलत असताना शहरी लोक मात्र आपल्या मनसुब्यांचा थांगपत्ता लागू देत नसल्याचे आणि बोलले तरी मोजकीच प्रतिक्रिया देताना आपले मत उघड करीत नसल्याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com