शिरूर नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याची मागणी

शिरूर नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याची मागणी

Published on

शिरूर, ता. ३ : शिरूर नगरपरिषदेच्या लगतच्या शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी या ग्रामपंचायतींचा शहर हद्दीत समावेश होण्याच्या दृष्टीने विधिमंडळातील चर्चेने पुढचे पाऊल पडले आहे. शहराची हद्दवाढ होऊन ग्रामीण भागाच्या विकासालाही नजीकच्या भविष्यात चालना मिळू शकते. सर्वसामान्य जनतेने या होऊ घातलेल्या हद्दवाढीचे स्वागत केले असले; तरी गावकारभाऱ्यांनी नाके मुरडली आहेत.
शिरूर नगरपरिषदेची तातडीने हद्दवाढ करावी, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच टप्प्यात करताना शहरालगतच्या शिरूर ग्रामीण (रामलिंग) ग्रामपंचायत व तर्डोबाची वाडी ग्रामपंचायतीचा सहभाग शहरात करावा, अशी सूचना मांडली. या निर्णयातूनच ग्रामीण भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दीडशे वर्षांत हद्दवाढ नाहीच
ऐतिहासिक वारसा असलेल्या नगरपरिषदेची ब्रिटिश काळात १८६८ ला स्थापना झाल्यानंतर गेल्या दीडशे वर्षांत हद्दवाढ झाली नाही. साडेसहा हजार चौरस मीटर एवढे नगरपरिषदेचे क्षेत्रफळ असून, हद्दवाढीनंतर हे क्षेत्रफळ दुप्पट होणार आहे. त्यादृष्टीने विकासासाठी शासनामार्फत भरीव निधीची तरतूद होऊन शहराबरोबरच ग्रामीण विकासालाही चालना मिळणार आहे.

ग्रामीण भागाचा विकास साधला जाणार
शहरालगत असलेल्या शिरूर ग्रामीण आणि तर्डोबाची वाडी या ग्रामपंचायतींचा गेल्या काही वर्षांत मोठा विस्तार झाला. दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून सुमारे ४० ते ५० हजार एवढी लोकसंख्या आहे. मात्र, पुरेशा निधी अभावी त्या तुलनेत नागरी सुविधा देण्यावर ग्रामपंचायतींना मर्यादा येत आहेत. भरीव निधीच्या तरतुदीनंतर शहरासह ग्रामीण भागाचाही नियोजनबद्ध विकास साधला जाणार आहे. त्यादृष्टीने या दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांचा नगरपरिषदेतील समावेशाला एकमुखी होकार आहे.

शिरूर शहर आणि ग्रामीण असे दोन भाग मानल्या गेलेल्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण झाल्यास मोठी नगरपरिषद अस्तित्वात येऊन विकासासाठी शासन स्तरावरून भरीव निधी मिळेल व त्यातून नियोजनबद्ध विकास साधता येईल. शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी येथील रहिवाशांचा दैनंदिन शहराशीच संपर्क असतो. एकत्रीकरणानंतर चांगल्या सोयी -सुविधा देखील उपलब्ध होतील.
- ज्ञानेश्वर आबा कटके, आमदार, शिरूर.

शहरात मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास आलेले बाहेरगावचे रहिवासी, रांजणगाव औद्योगिकरणातील अधिकारी- कामगारांची राहण्यासाठीची पसंतीमुळे शहरातील नागरीकरण गेल्या काही दिवसांत वेगाने वाढले. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहरालगत असलेल्या बाबूराव नगर, रामलिंग रस्ता या परिसरातही वर्दळ वाढली आहे. शहर व ग्रामीण भागात चांगल्या गुणवत्तेच्या खासगी शाळांचे जाळे उभे राहिले असून, हद्दवाढीनंतर सर्वच स्तरांवर वेगाला चालना मिळणार आहे.
- रवींद्र बापू सानप, अध्यक्ष, आम्ही शिरूरकर फाउंडेशन


नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यास...
* शिरूर शहर व ग्रामीणच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल.
* शासनामार्फत भरीव विकास निधीची तरतूद होईल.
* ग्रामीण भागातील जमिनींचे भाव वधारतील.
* ग्रामीण भागातील छोटे उद्योग, धंदे जोमाने चालतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com