
तळेगाव ढमढेरे येथे शेतकऱ्यांचा मोर्चा
तळेगाव ढमढेरे, ता.१५ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी नुकताच मोर्चा काढला. यावेळी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला व महावितरणचे कनिष्ठ अभियंता दादा बारवकर यांना निवेदन देण्यात आले.
तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, ऊस आदी पिके घेतली असून, थकीत वीज बिल भरावे या कारणासाठी महावितरणने शेतीपंपाची वीज तोडली आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीपंपाची तोडलेली वीज त्वरित जोडावी यासाठी गावातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन मोर्चाचे नियोजन केले होते.
हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास वीज तोडल्यामुळे हातातून निसटण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे शेतीपंपाची वीज त्वरित जोडावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, तसेच शेतकऱ्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन बारवकर यांनी निवेदन स्वीकारताना दिले.
04368