कोंढापुरीतील ग्रामस्थांना पाण्याचा प्रतीक्षा

कोंढापुरीतील ग्रामस्थांना पाण्याचा प्रतीक्षा

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. १: प्रत्येकास शुद्ध आणि मुबलक पाणी पिण्यासाठी मिळावे त्यासाठी ‘हर घर जल योजना’ केंद्र सरकारने सुरू केली. कोट्यवधी रुपयांचा निधीही देण्यात आला. मात्र, योजनेच्या निधीला कात्री लागल्याने कोंढापुरी (ता. शिरूर) येथील जलजीवन योजना अद्याप रखडलेल्या अवस्थेत आहे. योजनेतून पाणी केव्हा मिळणार या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत. योजना पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
कोंढापुरी गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे जलजीवन योजना २०२३ मध्ये सुरू झाली. योजना पूर्ण करण्यासाठी २७ महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. जॅकवेल व पंप हाऊस १० मीटर व्यासाचा असून, ॲप्रोच ब्रिज ३० मीटर लांब व ४ मीटर रुंद आहे. अशुद्ध पाणी पंपिंग मशिनरी व दाब नलिका, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी व दाबनलिका, गावठाणामध्ये उंच टाकी असून ८५००० हजार पाण्याची क्षमता, १२ मीटर उंची आहे. कवठीमळा येथे ७०००० हजार पाणी साठवण क्षमता असून, उंची १२ मीटर आहे. सध्या गावठाणातील टाकी एक लाख २५ हजार क्षमतेची असून तिची उंची १२ मीटर आहे. घरगुती नळ जोडणी १७८ असून, सोलर सिस्टिम बसविण्यात येणार आहे.

जल जीवन मिशन योजनेतील फिल्टर हाऊस व बांधकामाचे मानांकन अपूर्ण काम असल्यामुळे ग्रामपंचायतीने अद्याप ताब्यात घेतलेली नाही. दरम्यान या कामाबाबत शासनाचे उपअभियंता यांनी ठेकेदाराला वेळोवेळी तांत्रिक सूचना दिलेल्या आहेत.

योजनेतील सुविधा
गावची लोकसंख्या २०२४ मध्ये ५४४१ इतकी असून, २०५४ पर्यंत १२८२१ इतकी गृहीत धरली आहे. अंदाजपत्रकीय रक्कम नऊ कोटी ७० लाख ७८ हजार रुपये असून, स्वीकृत निविदा रक्कम सहा कोटी ७९ लाख ६९ हजार रुपये इतकी आहे. संबंधित कंपनीचे संचालक ठेकेदार म्हणून योजनेचे काम करीत आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी २७ महिन्यांचा कालावधी ठेकेदाराला दिलेला आहे.

पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती
सध्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे जुन्या नळ योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी दानशुरांच्या मदतीने गावात जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली आहेत. त्यामुळे सध्या तरी गावाला पाण्याची टंचाई नाही. येथील शासकीय तलावात चासकमानचे पाणी सोडले जाते. या तलावातून कोंढापुरी, रांजणगाव गणपती, शिक्रापूर व इतर शेजारील गावांना पाणीपुरवठा केला जातो. या तलावातून कोंढापुरी गावची जल जीवन योजना राबविण्यात येत आहे.

योजनेबद्दल ग्रामस्थांच्या तक्रारी
जलजीवन योजनेसाठी घेतलेल्या ग्रामसभेत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जल जीवन योजना रखडल्याने ग्रामस्थांना शुद्ध व मुबलक पाणी कधी मिळेल याची शंका सर्वांनाच आहे. या योजनेसाठीच्या जलवाहिनी करताना जागोजागी रस्ते खोदलेले आहेत. ते रस्ते प्रशासनाने दुरुस्त करून द्यावेत, अशी मागणी उपसरपंच मनीषा गायकवाड, राष्ट्रपती पारितोषिक विजेते धनंजय गायकवाड, ग्रामसेवक राजाराम रासकर व ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामसभेतील ठरावानुसार वाढीव लोकसंख्या व कामगारांची संख्या तसेच कंपन्यांची संख्या लक्षात घेता गावठाणात स्वतंत्र टाकी बांधावी, वाडी वस्तीवरील नागरिकांना या योजनेतील पाणी मिळावे. अपूर्ण राहिलेली योजना त्वरित पूर्ण करावी, सर्व लाभार्थींना शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा चालू असून, योजना पूर्ण झाल्यानंतरच ग्रामपंचायतीकडे ही योजना वर्ग केली जाईल.
- संदीप डोमाळे, सरपंच
08522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com