कांदा सडल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत अश्रू
टाकळी हाजी, ता. १३ : शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू जाणार आहे. बाजारात कांद्याचे भाव कोसळून ८ ते १० रुपये प्रतिकिलो इतके खाली आले आहेत. शिवाय हजारो क्विंटल कांदा विविध चाळ्यांमध्येच सडला असून, उत्पादन खर्चही वसूल होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यात कांद्याची काढणी करून तो चाळ्यांमध्ये साठवला होता. ‘आज-उद्या भाव वाढतील’ या आशेवर शेतकरी वाट पाहत होते. मात्र दिवाळीच्या तोंडावर बाजारभाव आणखी घसरले आणि जपून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी कर्ज घेतले होते. त्या पैशातून औषधे, मजुरी, पाणी, वाहतूक यांचा मोठा खर्च झाला. “कांदा विकून मुलींचे शिक्षण, आरोग्यखर्च, लग्नखर्च भागवू,” अशी आशा होती; पण सलग दोन वर्षे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित बिघडले आहे.
शासनाने मदतीचा हात देण्याची गरज
शिरूर तालुक्यात हजारो चाळ्यांमध्ये सडलेला कांदा दिसत आहे. कांद्याचे नुकसान सरकारने तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी आणि नैराश्यग्रस्त होत असून, त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेला कांदा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नको. मात्र, शेतमालास हक्काचा बाजारभाव हवा आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
- देविदास पवार, कांदा उत्पादक, टाकळी हाजी (ता. शिरूर)
00700
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.