बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एक बळी
टाकळी हाजी, ता. २ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. २) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात सातवीत शिकणाऱ्या रोहन बाळू बोंबे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाला. या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या वीस दिवसांतील हा तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रास्ता रोको आंदोलन करत वन विभागाचे वाहन जाळले.
पिंपरखेड येथील दत्तवाडी परिसरातील शेतात बाळू बोंबे यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या आजूबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. या घराच्या बाहेर मोकळ्या जागेत त्यांचा मुलगा रोहन हा रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शौचास बसला होता. त्यावेळी बिबट्याने झडप घालत त्याला शेजारील उसात ओढत नेले. त्यावेळी मुलाचा आरडाओरडा ऐकून त्याचे वडील व आईने बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बिबट्या त्यांच्यावरही डरकाळ्या फोडत होता. मात्र, त्यांनी बिबट्याच्या तावडीतून रोहन याला सोडवले. मात्र, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोंबे कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या परिसरात दर दहा- दहा दिवसांच्या अंतराने बिबट्याने तिघांचा बळी घेतला आहे. प्रत्येत घटनेवेळी प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय कोणतीही ठोस कृती होत नसल्यामुळे ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लोकप्रतिनिधींवरही तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. वनमंत्री आल्याशिवाय रोहन याचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठविणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यासाठी पंचतळे येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, वन विभागाच्या वाहनाची मोडतोड करून त्याला आग लावली. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करीत तीव्र संताप व्यक्त केला.
पिंपरखेड येथेच १२ आॅक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. ती आपल्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांना शेजारील शेतात पिण्याचे पाणी देण्यासाठी जात होती. त्यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. तसेच, या घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर जांबूत येथे २२ आॅक्टोबर रोजी भागूबाई रंगनाथ जाधव (वय ७०) ही महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. आता रोहन बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
‘अजून किती मृत्यूची
सरकार वाट पाहतंय?’
गेल्या वीस दिवसात तीन निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामध्ये आमचे दोन चिमुकले जीव गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत, मात्र मायबाप सरकारला अजूनही जाग येत नाही. अजून किती लोकांचे कुटुंब उध्वस्त करण्याचे मायबाप सरकार वाट पाहतंय, अशी तीव्र प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक यावेळी व्यक्त करीत होते.
‘लेकरांपेक्षा बिबट्या महत्त्वाचा का?’
आमच्या लेकरांच्या जीवापेक्षा मायबाप सरकारला बिबट्या महत्त्वाचा झाला असून त्यांना त्याची काळजी आहे. आम्ही या ठिकाणी राहायचं का नाही? शेती करायची का नाही? असा तिव्र सवाल येथील महिलांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

