उरुळी कांचनमधील ९९० बालकांचा आधार खुंटला

उरुळी कांचनमधील ९९० बालकांचा आधार खुंटला

Published on

उरुळी कांचन, ता.२४ : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील सुमारे ९९० बालके जन्म दाखल्यापासून वंचित असल्याने त्यांचे ‘आधार कार्ड’ ही काढता येत नसल्याने त्यांचा ‘आधार’च ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे खुंटला आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत परिसरातील २०२४ साली वेगवेगळ्या खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच घरी जन्म घेतलेल्या बालकांच्या जन्माची नोंद ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित ठेवण्याने व आता त्या पोर्टलवरून नोंद करून देता येत नसल्याने ही बालके जन्म दाखल्यापासून वंचित आहेत. महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या नवीन निर्णयानुसार आधार कार्ड नोंदणीसाठी क्यूआर कोड असलेला जन्म दाखलाच ग्राह्य धरावा या आदेशाने या बालकांच्या आधारची नोंदणी होऊ शकत नाही आणि सर्व शासकीय कामकाजात वा खासगी ठिकाणी आधार आवश्यक असल्याने या मुलांचा आधारच खुंटला आहे. या बालकांचे पालक ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरे झिजवून झिजवून मेटाकुटीला आले आहेत. केंद्र सरकारने ‘नागरी नोंदणी प्रणाली’ यंत्रणा संपूर्ण देशातील जन्म व मृत्यूची नोंद करणारे हे पोर्टल ग्रामपंचायती व जनतेच्या वापरासाठी (जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा २०२३ नुसार) १ ऑक्टोबर २०२३ पासून खुले केले. यावरच जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करणे अनिवार्य केले. त्याला अनुसरून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला हे पोर्टल वापरण्यासाठी लॉगिंन आयडी व पासवर्ड देण्यात आला आणि त्यावरच जन्म-मृत्यूच्या नोंदी करण्याची सक्ती करण्यात आली. मात्र, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने २०२४ या वर्षात झालेल्या बालकांच्या जन्माच्या नोंदी नेमक्या कोणत्या कारणाने या पोर्टलवर केल्या नाहीत याचे उत्तर आजमितीला कोणीही स्पष्टपणे देत नाही. याबाबतची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील निशांत कुंडे या कर्मचाऱ्यास दहा ते बारा वेळा फोन केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

नागरिकांना ग्रामपंचायतीचे उत्तरे
ग्रामपंचायत कार्यालयातून प्रत्येक वेळी त्यांना चार दिवसांत देतो, आठ दिवसांत देतो, होईल दोन-तीन दिवसांत पोर्टल सुरू होईल मग नोंद करून देतो, अशी उत्तरे देण्यामुळे, या बालकांचे भवितव्य गेल्या दोन वर्षांपासून टांगणीला लागले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

सन २०२४ मधील सीआरएस पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीचे काम झालेले नाही हे वास्तव आहे; मात्र त्यावेळी मी येथे कार्यरत नव्हतो त्यामुळे त्या का केल्या नाहीत हे सांगता येणार नाही.
- प्रकाश गळवे, ग्रामपंचायत अधिकारी, उरुळी कांचन (ता. हवेली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com