‘शिरसाई उपसा’च्या रब्बी आवर्तनाने उडविली झोप
विजय मोरे : सकाळ वृत्तसेवा
उंडवडी, ता. १६ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) परिसरातील शेतकऱ्यांची शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनाने झोप उडवली आहे. योजनेचे पाणी १६ किलोमीटर वरील शेवटच्या गावांना पोचण्यासाठी तब्बल ७० तास लागले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तीन रात्री ‘जागते रहो’चा पहारा दिला. योजनेत सातत्य नसल्याने पाणी पोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामातील आवर्तन डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ३ मधून उंडवडी कडेपठार हद्दीतील तळपट्टी येथे सुरू आहे. मात्र शनिवारी (ता. १५) सकाळी तीन तास योजनेतील तांत्रिक बिघाड झाल्याने पंप बंद राहिले. त्यामुळे संबंधित ठिकाणी पाणी पोहचण्यासाठी तब्बल ७० तास लागले. इतर वेळी योजनेचे पाणी २४ ते ३० तासात पोहचते.
शिरसाईच्या डाव्या कालव्यावर पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. तसेच कालव्यात झाडे-झुडपे व ठिकठिकाणी घाणीचे प्रमाण वाढले आहे. योजनेतून ६७० अश्वशक्तीने तीन पंपाद्वारे सोडलेले पाणी शेवटीच्या गावांना अवघ्या एका पंपाचेच मिळते. यासाठी आम्ही रात्रभर मागे कालव्यावर फिरून पहारा द्यावा लागत असल्याचे शेतकरी संतोष जराड, गणेश जराड, अर्जुन साळुंखे, विशाल जराड, दिगांबर जराड व विशाल डेरे यांनी सांगितले.
योजनेच्या पाण्यात सातत्याचा अभाव
हंगामात चार ते पाच वेळा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे योजनेचे पाणी खंडित झाले. शिरसाईच्या लाभार्थी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. योजनेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पाटबंधारे विभागातील अंतर्गत इलेक्ट्रिक व हायड्रो इलेक्ट्रिक हे दुरुस्तीसाठी एकमेंकावर बोट करून मोकळे होत आहेत. अशावेळी दुरुस्ती करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात दोन दिवस निघून जातात. परिणामी योजनेच्या पाण्यात सातत्य राहत नाही.
शिरसाई उपसा योजनेतील काही बाबीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. देखभाल दुरुस्तीसाठी हाड्रो इलेक्ट्रिक व यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ कार्यालयाकडे अंदाजपत्रक पाठवण्यात आले आहे. लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतर देखभाल दुरूस्ती करण्यात येईल.
- मुकेश विरनक, उप अभियंता यांत्रिक विभाग
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन वेळा पंप अचानक बंद पडले. दुरुस्तीचे काम यांत्रिक विभाग व हाड्रो इलेक्ट्रिकचे विभागाचे असते. त्यामुळे त्यांना सांगून दुरुस्ती करून घेतली. तीन-चार तासानंतर पंप सुरू झाले. मात्र, शेवटीच्या गावांना पाणी पोचण्यास विलंब झाला.
-अमोल शिंदे, कनिष्ठ अभियंता, शिरसाई उपसा योजना
शिरसाई योजनेच्या कालव्यावर मोठ्या प्रमाणावर पाझर व गळती तसेच पाणी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आम्ही तीन रात्री जागून योजनेचे पाणी आमच्या नाल्यात घेत आहे. पैसे भरून देखील खूपच कमी क्षमतेने पाणी मिळत आहे. योजना बंदिस्ती जलवाहिनीद्वारे होणे, गरजेचे आहे.
- विशाल डेरे, शेतकरी, उंडवडी क. प.
02606
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

