पानशेतच्या पाणलोट क्षेत्रात 
माणगावच्या तरुणाचा मृत्यू

पानशेतच्या पाणलोट क्षेत्रात माणगावच्या तरुणाचा मृत्यू

Published on

वेल्हे, ता. ६ ः माणगाव (ता. राजगड) पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेला एक २७ वर्षीय तरुण पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रघुनाथ मोतीराम जगताप (मूळ रा. बावले, जि. रायगड, सध्या रा. माणगाव, ता. राजगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रघुनाथ आणि त्याचे वडील मोतीराम जगताप हे दोघे २ मार्च २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असताना अचानक रघुनाथचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. त्यानंतर त्याचे वडील, वेल्हे पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता.
सलग दोन दिवस शोध घेऊनही रघुनाथचा पत्ता लागला नव्हता. अखेर आज ५ मार्च २०२६ रोजी सकाळी शोध घेत असताना माणगाव गावच्या हद्दीत रघुनाथचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने बाहेर काढून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मोतीराम जगताप यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com