वाल्हे येथे प्रवाशांची प्रचंड गैरसोय

वाल्हे येथे प्रवाशांची प्रचंड गैरसोय

Published on

वाल्हे, ता. ९ : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील नागरिक व नियमित प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत. वाल्ह्याहून पुणे किंवा नीरा दिशेने प्रवास करण्यासाठी सध्या कुठेही अधिकृत बसस्थानक वा एसटी थांबा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना महामार्गावरच उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
नव्या महामार्गामुळे गावाकडे जाणारे व गावातून बाहेर पडणारे पूर्वीचे सोयीचे रस्ते बंद झाल्याने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने सासवड आगाराला निवेदन दिल्यानंतर दोन- चार दिवस एसटी आगाराने महामार्गावरील पुलावर एक कर्मचारी उभा करून बसगाड्या पुलाखाली सेवारस्त्याला थांबविण्याची व्यवस्था केली. परंतु, ही सुविधा केवळ काही दिवसच सुरू राहिली. सध्या काही गाड्या पुलावरून जातात, तर काही गाड्या पुलाखालून मार्गस्थ होतात. त्यामुळे नेमके कुठे उभे राहायचे? हेच प्रवाशांना कळेनासे झाले आहे.
वाल्हे हे पुणे, सासवड, जेजुरी औद्योगिक वसाहत, नीरा, लोणंद, बारामती व फलटणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असतानाही येथे अधिकृत बसथांबा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी, नागरिकांकडून या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार सासवड व बारामती डेपोच्या बसगाड्या पुलाखालूनच सेवा रस्त्याने मार्गस्थ होतात. नीरा येथून येणाऱ्या इतर डेपोच्या गाड्यांसाठीही नीरा बसस्थानकात बस पुलाखालून नेण्याबाबत संबंधित शिक्का मारला जातो. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी माझ्या अधिकारात जेवढे शक्य होते ते सर्व मी केले आहे. पुढील सुधारणा करण्यासाठी वरिष्ठांकडे अर्ज पाठवा.
- मोहिनी ढेरे, बस स्थानक प्रमुख, सासवड

बस नेमकी पुलावर थांबणार की पुलाखाली? हे आम्हाला रोजचं कोडंच झालंय. उन्हात उभं राहून त्रास होतोच, पण महिलांसाठी ही परिस्थिती
अजूनच असुरक्षित आहे. प्रशासनाने तातडीने निश्चित बसथांबा करावा ही आमची विनंती आहे.
- स्वप्नाली देशपांडे, महिला प्रवासी, वाल्हे

वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी बस आवश्यक आहे. पण बस कुठे थांबेल? याचीच खात्री नसल्याने रोजचा प्रवासच धोकादायक झाला आहे. कधी पुलावर उभं राहावं लागतं, तर कधी पुलाखाली. याबाबत तातडीने उपाययोजना करायला हवी.
- रूपाली झुरंगे, आरोग्यसेविका, वाल्हे

सकाळी कॉलेजला जायची घाई असते, पण बस कुठे थांबते? याचा काही नेम नसल्याने रोज उशीर होतो. उन्हात तासन्‌तास उभं राहावं लागतं.
अभ्यासाचं नुकसान होतंय आणि प्रवासही असुरक्षित वाटतो. विद्यार्थ्यांसाठी तरी योग्य बसथांबा लवकरात लवकर करावा.
- ऋतुजा पवार, विद्यार्थिनी

05949

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com