पूर उपाय योजनांसंदर्भात समिती आक्रमक

पूर उपाय योजनांसंदर्भात समिती आक्रमक

महाड, ता. १२ (बातमीदार) : पावसाळ्यात दरवर्षी महाड शहरात पूर येतो. त्यावर उपाययोजना करण्यात सरकारी यंत्रणेकडून चालढकल होते, असा नागरिकांचा आरोप आहे. पूर निवारण कामाला गती देण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्याचा निर्णय रविवारी महाड पूर निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पूर निवारण समितीची बैठक उदय पयेलकर फार्म हाऊस येथे १० एप्रिलला झाली. बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला नितीन पावले यांनी महाड पूर निवारण समितीच्या कामाचा आढावा घेतला.

पुराची समस्या निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून आणि सरकारच्या विविध खात्यांकडून चालढकल करण्यात येतो. त्याबद्दल बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. पूर निवारण उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊनही सरकारी अधिकाऱ्यांची याबाबत असलेली उदासीनता व निष्क्रियता याबाबत प्रामुख्याने बैठकीत चर्चा करण्यात आली.

सावित्री नदीवरील राजेवाडी येथील जुन्या पुलाचा ढाचा पाडण्यासंदर्भात चार महिन्यांपासून सातत्याने चालढकल सुरू आहे. याबाबत आता सरकारी यंत्रणेला अंतिम इशारा दिल्याशिवाय हे काम काही पूर्णत्वास जाणार नाही, असे सर्वांचे एक मत या बैठकीत झाले.
सावित्री नदीच्या खोऱ्यातील सुमारे ३५ गावे ही पूरग्रस्त आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रांतील महाड उत्पादक संघ प्रतिनिधी, पूर निवारण समिती आणि या गावांतील सरपंच, उपसरपंच आणि महाड एमआयडीसीमधील कारखान्यांचे प्रमुख प्रतिनिधी अशी एकत्रित तातडीची बैठक देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
सीआरझेडची परवानगी आल्यानंतर भोईघाट ते गांधारी नाका या भागातील गाळ काढण्यासाठी सरकारकडून पुरेशी यंत्रसामग्री आणि त्यांना लागणाऱ्या डिझेलची तरतूद व्हावी. निधी अपुरा पडू नये, यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत विनंती केली जाणार आहे. पुढील ४० दिवसांत गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश द्यावेत आणि काम त्वरित गतिमान पद्धतीने व्हावे, अशी विनंती केली जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जुन्या सावित्री पुलाच्या ढाचा काढण्यासंदर्भात महामार्ग विभाग आणि प्रशासनाला १५ एप्रिल अंतिम तारीख द्यावी, असे ठरले. या संदर्भात कार्यवाही झाली नाही, तर नडगाव येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाड आणि पंचक्रोशीतील नागरिक सहभागी होतील, असेही बैठकीत ठरले.
बैठकीमध्ये रवी वेर्णेकर, समीर मेहता, श्रीकृष्ण बाळ, मनीष मेहता, जितेश तलाठी, सिद्धेश पाटेकर, डॉ. समीर बुटाला, दिनेश जैन, संजय मेहता, प्रदीप वडके, महाड उत्पादक संघाचे संभाजी पाठारे, विष्णू केंजळे, उदय पयेलकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
.......................
आक्रोश सभा घेणार
महाड शिवाजी चौक येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मोठी आक्रोश सभा घेण्याचे पूर निवारण समितीच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. कोकण रेल्वेविरुद्ध मोठे आंदोलन करणे याबाबत लोकप्रतिनिधींना भेटून त्याची तारीख पुढील दिवसांत नक्की करायची, अशी चर्चा बैठकीत झाली. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी गावागावात जाऊन सभा घ्यायच्या आणि जनजागृती करायची, असेही ठरविण्यात आले.
....,.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com