स्वाती मुजुममदार
डॉ. स्वाती मुजुमदार
---
कौशल्य विकास विद्यापीठे हेच भारताचे भवितव्य!
कौशल्य विकास विद्यापीठच्या पदव्यांना समाजात वा उद्योगांकडून मान्यता मिळावायची असेल, तर विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि कौशल्य विकासाशी संबंधित नियामक संस्थांनी एकत्र येऊन नियमांचा किंवा मार्गदर्शक तत्त्वांचा वा कायद्याचा मसुदा बनवावा. या विद्यापीठांची कार्यप्रणाली वेगळी ठेवावी. कारण हे जग वेगळे आहे. नॅकनेही कौशल्य विकास विद्यापीठांसाठी वेगळे नियम बनवावेत. ते तयार करताना उद्योगांमधील तज्ज्ञांना बरोबर घेतले पाहिजे. आता कौशल्य विकास मंत्रालय तयार झाले आहे. म्हणून ही विद्यापीठे उच्च शिक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली न ठेवता त्याला कौशल्य विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणले पाहिजे.
- डॉ. स्वाती मुजुमदार
राज्य सरकारला राज्याचे व्होकेशनल एज्युकेशनचे धोरण तयार करावे वाटले. त्यानंतर साधारण २००८ मध्ये एक एकरा सदस्यांची समिती तयार करण्यात आली. त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. यात कौशल्य विकासाचा मसुदा तयार करण्याचे काम केले. त्या समितीन सखोल संशोधन केले. त्यात असे दिसून आले की कौशल्य प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मागणी होत नाही. पण राज्यात त्यावेळी पाच-साडेपाच लाख विद्यार्थी कौशल्य विकासाचे शिक्षण घेत होते. मात्र, आमच्या काही अडचणी अशा लक्षात आल्या की कौशल्य विकासाचे पुढील शिक्षणाचे मार्ग आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यातून या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खंडित होतो. तिसरा प्रश्न असा होता की ज्यांच्याकडे कौशल्य आहेल, त्यांना आपला समाज त्या प्रकारचा दर्जा किंवा मान देत नाही. त्या काळात आम्ही हजारो पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून या समस्या लक्षात आले. त्याकडे पाहताना विद्यार्थ्यांच्या या समस्या कशा सोडवाव्यात, असा विचार सुरू असताना राज्यात एक कौशल्य विकासाचे विद्यापीठ असायला हवे, ही कल्पना पुढे आली. मग आम्ही ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन अशा अनेक देशांची कौशल्य विकासाची धोरणे आणि त्या प्रकारच्या विद्यापीठांचा अभ्यास आम्ही केला. त्यात असे लक्षात आले की अशी कौशल्य विकासाची विद्यापीठे अनेक देशांत खूप वर्षे आधीपासून कार्यरत आहेत आणि यशस्वी देखील आहे. त्याचा तेथील हजारो विद्यार्थ्यांना फायदा देखील झाला आहे. त्याचबरोबर तेथील उद्योगांना सुधा या विद्यपीठांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग होतो आहे. अनेक कंपन्या या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य देतात, असेही चित्र दिसून आले. राजेश टोपे त्यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्यांच्याबरोबर एक शिष्टमंडळ घेऊन आम्हाला श्रीलंकेला जाण्याची संधी मिळाली. तेथील युनिव्हॉक या कौशल्य विकास विद्यापीठ पाहायला मिळाले. त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याचा त्यांच्या देशाला, उद्योगांना आणि विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. मग राज्य सरकारने कौशल्य विकास विद्यापीठ करावे, अशी शिफारस आम्ही केली. पण ते काही सत्यात उतरले नाही. म्हणून सिंबायोसिसला वाटले की आपणच का कौशल्य विकास विद्यापीठ उभे करू नये? तेथून हा प्रवास सुरू झाला. त्यानुसार आम्ही संस्थेचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्याकडे हा विषय मांडला, त्याचे मॉडेल आम्ही त्यांच्यापुढे ठेवले. त्यांनाही ते आवडले आणि त्यांना आम्हाला परवानगी दिली. पुढची पाऊले पडू लागली आणि विद्यापीठ उभे राहिले.
चांगल्या अभ्यासक्रमांची गरज
आता त्याला दहा वर्षे उलटून गेली आहे. परिस्थितीमध्ये पुष्कळ चांगला बदल आता झालेला आहे. अनेक क्षेत्रात प्रगती झाली. सर्वच सरकारांना आता वाटू लागले आहे की कौशल्य विकासाबाबती आरखी चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. काळाची गरज लक्षात घेता चांगले अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे. त्यानुसार अन्य राज्यांमध्ये कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले. अनेक राज्यांमध्ये अशी विद्यापीठे उभी राहिली आहेत. अजूनही राहात आहेत. महाराष्ट्रानेही कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा कायदा पास केला. येत्या काळात हे विद्यापीठ उभे राहील. आम्ही देखील २०१६ मध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये कौशल्य विकास विद्यापीठ सुरू केले आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी आम्हाला पारंपरिक विद्यापीठ राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. पण पुढे तिथे कौशल्य विकास विद्यापीठ साकारले. आज तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण प्रशिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातही २०१७ मध्ये तसे विद्यापीठ सुरू केले.
कौशल्य असेल, तरच रोजगार
एकीकडे उद्योगांना चांगली कुशल मनुष्यबळ पाहिजे आणि दुसरीकडे शिकलेल्या लोकांना काम नाही. ही फार दुदैवी गोष्ट आहे. हा दरी भरून काढण्यासाठी अशी कौशल्य विकास विद्यापीठे मोठी भूमिका बजावू शकतात. त्याच अनुषगांने आम्ही पुणे आणि इंदूरमध्ये आम्ही ही विद्यपीठे सुरू केली आहेत. सुसज्ज पायाभूत सुविधा उभ्या केल्या. शैक्षणिक संकुले बांधली. अत्याधुनिक उपकरणे त्यात बसविली. आता ही विद्यापीठे उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करू लागली आहेत. पारंपरिक विद्यापीठांमध्ये तेथील व्यवस्थापन आणि प्राध्यापकांना वाटते, त्याप्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले जातात. परंतु स्किल युनिव्हर्सिटीमध्ये आधी उद्योगांमध्ये जाऊन त्यांना पुढील पाच वर्षांमध्ये कसे मनुष्यबळ लागणार आहे, याचे सर्वेक्षण केले जाते. त्याअनुषंगाने उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो. यामुळे विद्यार्थ्याला रोजगारासाठी कौशल्य हे मिळतेच. या विद्यापीठांचा पारंपरिक विद्यापीठांसारखा संशोधनावर नव्हे; तर रोजगार निर्मितीवर भर असतो. उद्योगांच्या मदतीनेही काही अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामुळे या विद्यापीठांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी हे रोजगारक्षम आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारेच असतात. अनेकजण स्वत:चे रोजगार सुरू करतात. कारण या विद्यापीठांमध्ये प्रत्यक्ष कामातून किंवा प्रात्यक्षिकांमधून शिक्षण मिळते. त्यामुळे सुरवातीपासून कौशल्ये रुजविण्याची सुरवात होते.
प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा
उद्योजक निर्मितीचे कामही ही विद्यापीठे करतात. या विद्यापीठांमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल, तर एक वर्ष ते विद्यार्थी हे थेट उद्योगांमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करतात. त्यामुळे तेथे कोणत्या मुनष्यबळाची गरज आहे, तिथे काम कसे केले जाते, याचा अंदाज आणि अनुभव त्यांना सुरवातीपासूनच येतो. म्हणूनच शिक्षण घेत असतानाच अनेकजण स्वत:च्या कंपन्या स्थापन करतात. नंतर त्यांना पदवी मिळाल्यानंतर नोकरी शोधण्याची गरजच पडत नाही. ते यशस्वी नवउद्योजक बनललेले असतात. आमच्या विद्यापीठातील सव्वा दोनशे विद्यार्थ्यांची पहिली बॅच जी बाहेर पडली, त्यातील ५२ मुले उद्योजक बनली. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या नवउद्योजकांना आर्थिक पाठबळासाठी काही सरकारी योजना निश्चितपणे सुरू झाल्या पाहिजेत. त्यातून त्यांना उद्योगाचा विस्तार करण्यासाठी मदत मिळेल. याशिवाय सरकारांनी कौशल्य विकासासाठी नाविन्यपूर्ण पावले उचलली पाहिजेत, असे वाटते. पहिले म्हणजे कौशल्य विकास विद्यापीठात प्राध्यापकांनी पीएचडी धारक असले पाहिजे, ही अट सरकारने काढून टाकली पाहिजे. कौशल्यच्या क्षेत्रात ज्याच्या हाता कौशल्य वा कला आहे, तेच दुसऱ्याला चांगले शिकवू शकतात. त्यामुळे पीएचडीची अट नसावी. पारंपरिक विद्यापीठाचे नियम या विद्यापीठांना लागू आहेत. त्यांच्यासाठी वेगळे नियम वा कायदे असावेत. यातून अभ्यासक्रम तयार करण्यात, अध्ययन-अध्यापन पद्धतीत विद्यापीठांना आणखी लवचितकता आणता येईल आणि एक सर्वंकष असा सर्वांगीण विकास झालेला कुशल उद्योजक वा उद्योजकांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ या विद्यापीठांना तयार करता येईल.
-----------------
आता तुमचे कॉलेज आले मोबाइलवर
कोविडमुळे शाळा, महाविद्यालये ओस पडली. शिक्षण मोबाइलद्वारे सुरू झाले. पण परीक्षेसाठी पुन्हा शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे लागते. परंतु मुंबई-पुणे मार्गावर किवळे येथे निसर्गरम्य परिसरात वसलेल्या सिंबायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने केवळ अभ्यासक्रमच नव्हे; तर प्रत्यक्ष पदवीचे शिक्षणही मोबाइलवर आणले आहे. यात तुम्हाला पारंपरिक पदवीचे शिक्षण मोबाइलवरच घेता येणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा देखील मोबाइलवर आणि त्यानंतर या प्रसिद्ध विद्यापीठाची पदवी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सगळ्याचा विद्यार्थ्यांना पुण्याला येऊन सिंबायोसिस वा अन्य कोणत्या विद्यापीठात वा महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे शक्य होत नाही. अनेकदा ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून या विद्यापीठाने सामाजिक गरज लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना शिक्षण पोचविण्याचा आणि त्यांना मोबाइलवर पदवी शिक्षण घेण्याचा पर्याय अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी सिंबायोसिस सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंग सुरू करण्यात आले आहे. त्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे अभ्यासक्रम विद्यापीठांना अतिशय माफक दरात शिकविले जाणार आहेत. सामान्य विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे.
सर्व अभ्यासक्रम हे ऑनलाइन आहेत. ते मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले जाणार आहेत. अतिशय दुर्गम भागातील आणि गरीब घरातील मुलां-मुलींना या अभ्यासक्रमांचा खूप फायदा होणार आहे. कारण अनेकांकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप असतेच असे नाही. परंतु मोबाइल आज सर्वांकडे आहे. त्यामुळे मोबाइलवर शिक्षण आणून शिक्षण क्षेत्राला पथदर्शी असे पाऊल या विद्यापीठाने टाकले आहे. आपण पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेताना वर्गात जातो, मग शिक्षक येतात आणि ते फळा-खडूच्या साह्याने शिकवतात. पण छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. हे व्हिडिओ अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिक्षकाचा आवाज, अभ्यासक्रमातील घटकांचे विश्लेषण यांचा दर्जाही उच्च आहे. यामुळे विद्यार्थ्याला वर्गात बसून शिक्षण घेतल्याचा अनुभव मिळेल.
अतिशय सोप्या भाषेत हे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. ते विद्यार्थ्यांना सहजपणे समजू शकतील. जे लोक दिवसभर राबतात, कष्ट करतात अशांना देखील सहजपणे शिकण्याची संधी उपलब्ध व्हावी, असाही उद्देश समोर ठेऊन विद्यापीठाने हे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. केवळ तरुणच नव्हे; तर अर्थवट शिक्षण सुटलेले लोक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी यांनाही यामध्ये शिक्षण घेता येईलह हे सर्व शिक्षण मोबाइलवर असल्याने घरात बसून तुम्ही पदवी मिळवू शकणार आहात. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. शिक्षण हे सहज, सोप्या मार्गाने लोकापर्यंत आता सिंबायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पोचविले जाणार आहे.
----
ऑनलाइन डिग्री कोर्स
- बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम)
- बॅचलर ऑफ आर्टस् (बीए-मराठी, इंग्रजी)
- बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए)
- बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)
- मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए)
(स्पेशलायझेशन : मार्केटिंग, एचआर, फायनान्स, हेल्थकेअर मॅनेजमेंट)
---
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
- संपूर्ण कोर्स मोबाइलवर
- २४ बाय ७ उपलब्ध
- ऑनलाइन क्लासेस तज्ज्ञ प्राध्यापकांकडून
- अभ्यासक्रमाचे शुल्क परवडणारे
- अभ्यासक्रम करताना नोकरीसाठी सल्ला
----
सिंबायोसिस सेंटर फॉर लर्निंग
- व्हॉट्सॲप : ८९५६१४२९९४
- मिस्ड कॉल : ८९२९७९१६३३
- कॉल : ८९५६१४२९९४
-----------------------
पगाराचे १४ लाखांचे पॅकेज
पदवीधर विद्यार्थ्यांना विनामूल्य तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यासाठी सिंबायोसिसने पाऊल टाकले आहे. सिंबायोसिस डिजिटल अॅकॅडमी यांच्या मदतीने सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. कौशल्य विकास शिबिरे आणि तरुणांना उद्योग तज्ज्ञांसह विविध कौशल्याचे मार्गदर्शन असे त्याचे स्वरुप आहे. या प्रशिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल्स आणि अॅप्टिट्यूड स्किल यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना उद्योगांची ओळख व्हावी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर काम करण्याच्या संधी त्यांना उपलब्ध होतील.पदवीधर वा अर्धवट शिक्षण झालेल्या तरुणांमध्ये कौशल्य रुजवून त्यांना रोजगारक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम जेपी मॉर्गन आणि कॅपजेमिनी यांच्या साह्याने सुरू करण्यात आला. यात एकूण दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले. आतापर्यंत ८०० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. अन्य विद्यार्थी इतर प्रशिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रातील उद्योग, ज्यात टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, एअरबस या मोठ्या उद्योगांपासून ते फिनोलेक्स, ध्रुव, कॅपजेमिनी आणि इतर स्टार्टअप्स सारख्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. यातील काही जणांना मुलांमध्ये वार्षिक १४ लाख पगाराचे पॅकेज मिळाले आहे.
----
मुलींच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार
सिंबायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल विद्यापीठाने मुलींच्या कौशल्य विकासावर भर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यापीठाने सामाजिक भावनेने फियाट इंडियाबरोबर वंचित घटकातील मुलींसाठी पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. WINGYAAN हा सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आणि फियाट इंडिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत समाजातील वंचित घटकांमधील मुलींना कौशल्य आधारित ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ पही पदविका दिली जाते. हा एक निवासी अभ्यासक्रम आहे. पुण्यातील सिंबायोसिस स्किल्स ॲंड प्रोफेशनल विद्यापीठच्या कॅम्पसमध्ये तसेच Fiat India च्या कारखाना परिसरात आयोजित केला जातो. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तसेच रांजणगाव पुणे येथील फियाट इंडियाच्याकारखान्याच्या परिसरात हे प्रशिक्षण दिले जाते. त्याची अंमलबजावणी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे द्वारे केली जाते. WINGYAAN च्या पहिली तुकडीचे प्रशिक्षण मे 2019 मध्ये सुरू करण्यात आले. मुलींनी वा महिलांनी सक्षम बनावे. शिक्षण घेऊन रोजगार करावा आणि स्वावलंबी बनावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
विशेषत: ऑटोमोबाईल आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये मुली आणि महिलांचा सहभाग वाढावा आणि मुख्य प्रवाहातील उद्योग क्षेत्रात मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.
-----
गरजू महिलांना आधार
सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी ने सामाजिकतेचं भान ठेवत सिम्बोयसिस कम्युनिटी कॉलेज अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात ज्या घरातील कमावती व्यक्ती मरण पावली, अशा घरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलबध करून देण्यासाठी मदत केली जात आहे. या मध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांना रोजगार मिळवून देणे हाही उद्देश आहे. या महिलांना टेलरिंग, हर्बल सौंदर्य प्रसाधने, मास्क, सॅनिटायजर, सॅनिटरी पॅड बनवणे याचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत ७० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी १०० महिलांच प्रशिक्षण सुरू आहे. या महिलांना आपल्या मालाची विक्री व वितरण शक्य नसल्यामुळे सिंबायोसिस ओपन सोसायटीने काही कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करून, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.