जीवरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

जीवरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, ता. १० ः कोरोनामुळे जलतरण तलाव बंद राहिल्याने दोन वर्षांपासून बेरोजगार झालेल्या एका जीवरक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंढवा येथील केशवनगरमध्ये घडली. जलतरण तलावांच्या जीवरक्षकांचा रोजगार धोक्‍यात आला असून त्याचा पहिला बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया जीवरक्षकांकडून व्यक्त करण्यात आली.
दत्ता शंकर पुशिलकर (वय ४१, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुशिलकर व त्यांची आई असे दोघेजण केशवनगर येथील कुंभारवाडा परिसरात राहात होते. अनेक वर्षांपासून ते बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या नांदे जलतरण तलावामध्ये जीवरक्षक म्हणून कार्यरत होते. कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून शहरातील सर्वच जलतरणतलाव बंद करण्यात आले. त्यामुळे पुशिलकर यांचीही नोकरी गेली, त्यानंतर ते रोजगाराच्या शोधात होते. दरम्यान, मुंढवा येथील एका जलतरण तलावामध्ये जीवरक्षक म्हणून काम मिळाले होते, परंतु तेही काम गेले. त्यामुळे पुशिलकर हे बेरोजगार झाले होते. त्यांनी अनेक ठिकाणी काम मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काम मिळाले नाही. हाताला रोजगार नसल्याच्या तणावातूनच पुशिलकर यांनी रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पुशिलकर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

पुशिलकर हे उत्तम जीवरक्षक होते. कोरोनामुळे सरकारने जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुशिलकर यांच्यासारख्या व्यक्तींवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कोरोनासाठी आरोग्य उत्तम राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोहणे हा देखील व्यायामाचाच एक भाग आहे. पोहण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यास मदत होते. तसेच जलतरण तलावातील पाणी क्‍लोरीनयुक्त असल्याने त्यामध्ये कोरोनाचा विषाणू टिकू शकत नाही. त्यामुळे आता तरी सरकारने जलतरण तलाव सुरु करावेत.
- मनोज एरंडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते

जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्युएचओ) व्यवस्थित देखभाल असलेल्या जलतरण तलावातून कोरोना पसरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सोडियम हायपोक्‍लोराइडचा वापर केला जातो. असेच कॅल्शियम हायपोक्‍लोराइड रसायन जलतरण तलावाच्या पाण्याच्या फिल्टरेशनसाठी वापरले जाते. पहिल्या लॉकडाउननंतर ‘स्पोर्ट्‍‌स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही तलावाच्या पाण्यात क्‍लोरिनची मात्रा किती असावी, याचेही निर्देश दिले होते. त्याचे पालनही केले जाते. असे असतानाही जलतरण तलाव बंद करण्याचा घाट कशासाठी पाहिजे.
- स्वोजस गोडसे, जलतरण प्रशिक्षक

सुदैवाने तलाव बंद असल्याच्या काळातले तलावांचे भाडे महापालिकेने अद्याप तरी घेतलेले नाही. पण तरीही तलाव बंद करण्याच्या काळातही तलावाची देखभाल करावी लागते. त्यासाठी किमान महिन्याला सव्वा लाख रुपयांचा खर्च येतो. तलावाची सफाई, क्‍लोरिन तसेच जीवरक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे पगार तलाव चालकांना द्यावेच लागतात. तलाव बंद असल्याने उत्पन्न मात्र काहीच नाही. त्यामुळे जलतरण तलाव सुरू करण्यास परवानी देण्याची गरज आहे.
- भुपेन आचरेकर, तलाव चालक व जलतरण प्रशिक्षक

जलतरण तलावांची संख्या
- महापालिकेचे जलतरण तलाव - ४० ते ४५
- स्पर्धात्मक जलतरण तलाव - १०-१२
- खासगी - १०० पेक्षा जास्त
- जीवरक्षकांची संख्या - २०० ते २५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com