भरतीसाठी गेलेल्या तरुणांना मिळाला आधार

भरतीसाठी गेलेल्या तरुणांना मिळाला आधार

पुणे, ता. ११ ः आसाम रायफल्सच्या भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या मराठी तरुणांची तेथे मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली होती. या घटनेची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गांभीर्याने दखल घेत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर तेथे अडकलेल्या तरुणांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. चांगले जेवण, गरम पाणी अशा सुविधा मिळाल्यामुळे मुलांनी समाधान व्यक्त केले. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

आसाम रायफल्सची भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारीदरम्यान होणार होती. महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे अशा विविध जिल्ह्यातून २५० हून अधिक उमेदवार तीन जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलॉँग या जिल्ह्यातील दिपू या छोट्याशा शहरामध्ये दाखल झाले होते. तेथेच त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. मात्र, भरतीपूर्वीच उमेदवारांची कोरोनाची रॅपिड अँटिजेन तपासणी झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० ते ७० जण कोरोनाने बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यासह दोनशेहून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले होते, तेथे त्यांची हेळसांड झाली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झाले होते.

तरुणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांना दोन ते तीन दिवस जेवण, पुरेसे पाणी मिळाले नव्हते. त्यानंतर मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे तरुणांची तब्येत खालावली होती. दिपू हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असल्याने व तेथील हवामानामुळे तरुणांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. याबाबत तरुणांनी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष, नेते, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तरुणांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसमोर आपली कैफियत मांडली, त्याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकाराबाबत वृत्त प्रसिद्ध करून त्याकडे लक्ष वेधले होते. तसेच ‘साम टीव्ही’नेही या प्रश्‍नाकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधले. त्यानंतर या घटनेची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गांभीर्याने घेत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला मराठी तरुणांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार, तरुणांना चांगले जेवण, पिण्यासाठी गरम पाणी व अन्य आवश्‍यक सुविधा पुरविल्या होत्या.

दरम्यान, कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर २९ जणांना जाण्यासाठी परवानगी दिली होती. याशिवाय, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन मराठी तरुणांना मदतीचा हात दिला.

‘‘सकाळ, साम टीव्हीमुळे आमच्यावर ओढवलेल्या प्रश्‍नाला वाचा फुटली. ‘सकाळ’च्या वृत्तानंतर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चांगले जेवण, पिण्यासाठी गरम पाणी व अन्य आवश्‍यक सुविधा दिल्या. तसेच, काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडूनही आमच्या मदतीसाठी प्रशासनाला आर्थिक स्वरूपाची मदत केली.’’
- किरण आव्हाड, पारवा, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com