
‘शाश्वत विकास पर्यावरणासाठी आवश्यक’
पुणे, ता. १ : ‘‘जैविक विविधता कायदा जाणून घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हवामान बदल ही मोठी समस्या आपल्या समोर आहे. पर्यावरणाला वाचवणे मानवतेची गरज आहे. पर्यावरणाला हानी पोचविणारे गुन्हेगारांना कसे पकडणार यासाठी
सामाजिक जागृती असणे आवश्यक आहे. जैविक सुरक्षितता ही एक सामाजिक बांधिलकी आहे,’’ असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक प्रा. डॉ. इराच भरुचा यांनी व्यक्त केले.
जलविज्ञान विभाग, आयआयटी रुरकी, उत्तराखंड, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे न्यू लॉ कॉलेज पर्यावरण सेल यांच्या वतीने ‘जैविक विविधता कायदा : समस्या व आवाहने’ या विषयी ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. भरुचा यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘जैविक विविधता कायदा राबविण्यासाठी विशिष्ट आराखड्याची गरज आहे. शाश्वत विकास पर्यावरणासाठी आवश्यक आहे. तसेच, पर्यावरण वाचविण्यासाठी नियंत्रण कक्ष असणे गरजेचे आहे.’’ डॉ. मौशुमी म्हणाल्या,‘‘ प्रदूषण, जमीन-समुद्रामधील बदल, हवामान बदल, प्रजापती शोषण, रोग हा जैविक साधन संपत्तीला धोका आहे. जैविक सुरक्षितता ही मानवाच्या येणाऱ्या भावी पिढीच्या निरोगी व स्वस्थ आयुष्यासाठी महत्त्वाची आहे.’’ रिठे म्हणाले, ‘‘शाश्वत आणि अशाश्वत विकास या मधला फरक ओळखणे गरजेचे आहे. जैविक साधन संपत्ती ही सर्व देशात पोचली पाहिजे. ज्यामुळे त्याचा सर्वांना फायदा होऊ शकतो.’’
यावेळी डॉ. भरुचा यांच्यासह सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक किशोर रिठे, आयआयटी रुरकीतील जलविज्ञान विभागाच्या डॉ. मौशुमी हझरा, न्यू लॉ कॉलेजच्या अधिष्ठा डॉ. उज्ज्वला बेंडाळे, प्रा. डॉ. ज्योती धर्म, प्रा. डॉ. जयश्री खंदारे, ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते.