सेकंड मेन
---
NSK26H24173
----
पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या स्थितीत
(उपशीर्षक)
शेतकरी चिंतेत; आठवडाभर पावसाची चिन्हे नाहीत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचा खंड पडून पाऊस गायब झाला आहे. साधारण सहा दिवसांपासून पाऊस नसून कडक उन्हाचा चटका जाणवत आहे. यामुळे पावसानंतर लागवड झालेली पिके उन्हामुळे कोमेजू लागली आहेत. परिणामी शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा होती. तर मागील आठवड्यात सलग दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरणारा आहे. मात्र यानंतर पाऊस गायब झाला असून जोरदार वारे व कडक ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा देखील आता कमी होऊ लागला आहे. यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
नजरा आकाशाकडे
पावसाने दडी मारल्यामुळे सकाळपासूनच सूर्याचा कडक चटका जाणवत असून दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पिकांवर उष्णतेचा परिणाम दिसू लागला असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
चौकट
दमदार पावसाची गरज
पाऊस गायब झाला असून साधारण या आठवड्यात पाऊस येण्याची शक्यता नाही. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र खरीप पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी सर्वदूर दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे. आज (ता.१५) दुपारच्या सुमारास काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले.
–––––––––