फोटो : H24129
--
भावनिक, उत्कंठावर्धक ‘कालाय तस्मैय नम:’
महाकवी कालिदास दिनानिमित्त नाटकाचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : कवी कालिदासाच्या जीवनातील संघर्ष, आषाढातील पहिला पाऊस, पहिले प्रेम, राजकवी झाल्यानंतर बदललेली परिस्थिती, विरहाच्या वेदनेतून लिहिलेले महाकाव्य अशा या भावनिक आणि उत्कंठावर्धक ‘कालाय तस्मैय नम:’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.
निमित्त होते, महाकवी कालिदास दिनाचे. महापालिका व अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखा आयोजित नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. १५) कालिदास कलामंदिर नाट्यगृहात पार पडला. नाटकाच्या सुरवातीला नाट्यगृहाचे व्यवस्थापक मोहन गिते, नाट्य परिषदेचे विजय शिंगणे, राजेश भुसारे, महेश डोकफोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नाटकाची सुरवात आधुनिक काळातील आजी आणि तिची नात यांच्यातील संवादाने होते. आजीने लिहिलेल्या आषाढाचे नर्तन ही निसर्ग कविता ऐकताना मुले भावविश्वास हरवतात आणि तिथून पुढे कालिदासाचा जीवनप्रवास पडद्यावर उलगडत जातो. शोमॅन क्रिएशन प्रस्तुत दोन अंकी काव्यनाट्याचे लेखन, दिग्दर्शन, काव्यरचना, नेपथ्य, वेशभूषा विक्रम गवांदे यांची तर रंगभूषा कस्तुरी गांगुर्डे, पार्श्वसंगीत ज्योती सरोदे, प्रकाशयोजना श्रेया कडाळे, रंगमंच व्यवस्था मीरा शिंगोटे, नरेंद्र पुजारी यांची होती. अनंता आहेर (कालिदास), गीता शिंपी (मल्लिका), कविता होले (अंबिका), विक्रम गवांदे (विलोम), कौस्तुभ गायधनी (दंतुल) यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद राठोड यांनी आभार मानले.
-- चौकट
चारूदत्त दीक्षित यांची उणीव जाणवली
दरवर्षी कालिदास दिनी न चुकता नांदी सादर करणारे बागेश्री वाद्यवृंदांचे चारूदत्त दीक्षित यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे यंदा कालिदास दिनाला दीक्षित यांची नांदी सादर न झाल्याने उपस्थित प्रेक्षकांसह कलाकारांना दीक्षित नसल्याची उणीव जाणवली. या वेळी वैभव काळे यांच्या ताल वैभव वाद्यमेळ संघाने दीक्षित यांना श्रद्धांजलीपर नांदी सादर केली.
-------