३६-२
पिंपरी रौळस परिसरामध्ये
महावितरणची अनागोंदी
--------
वीजकपात न थांबल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुंदेवाडी, ता. १६ : पिंपरी रौळस (ता. निफाड) परिसरात महावितरणकडून सुरू असलेल्या वारंवारच्या वीजकपातीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ तासांपैकी तब्बल साडेपाच तास लोडशेडिंग होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मनसेचे सहकार विभागाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार गांगुर्डे यांनी केला आहे.
श्री. गांगुर्डे म्हणाले, सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने बहुतांश शेतकरी सिंचनासाठी शेतपंप वापरत नाहीत. केवळ घरगुती वापरासाठी पाणी भरण्यापुरतेच पंप सुरू केले जात आहेत. त्यामुळे विजेवरील अतिरिक्त भार असल्याचे कारण महावितरणकडून देता येणार नाही. अशा परिस्थितीत कोणतेही ठोस कारण नसताना नागरिकांवर लादली जाणारी लोडशेडिंग ही अन्यायकारक असून, महावितरणने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘राज्यात विजेचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असताना ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग का केले जात आहे? महाराष्ट्रातील ग्राहकांना अंधारात ठेवून इतर राज्यांना, विशेषतः गुजरातला, अखंडित वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न होत आहे का? या सर्व बाबींवर महावितरणने नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका गांगुर्डे यांच्यासह शेतकऱ्यांनी मांडली आहे.
---------------