मेन
फोटो : H24160
बाबूराव बागूल यांच्या साहित्याला मिळणार झळाळी
१८ वर्षापासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित, पण विचारांची चळवळ सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : मराठी साहित्यातील दलित साहित्याला नवी दिशा देणारे साहित्यिक, विचारवंत, कवी आणि कथाकार साहित्यरत्न बाबूराव बागूल यांची गुरुवारी (ता.१६) ९७वी जयंती आहे तर, येत्या तीन वर्षांनी जन्मशताब्दी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त बाबूराव बागूल प्रतिष्ठानतर्फे आबांचे अप्रकाशित राहिलेले साहित्य, समग्र गौरवगाथा, दिवाळी अंकातील कथा पुस्तकरूपी वाचकांना उपलब्ध होणार आहेत.
सुरुवातीच्या काळात घर कौलारू आणि मातीचे असल्याने बागूल यांचे दुर्मिळ साहित्य खराब झाले होते. दोन वर्षापूर्वी बाबूराव बागूल प्रतिष्ठानला सुरवात झाल्यानंतर या साहित्यावर नव्याने संस्कार करून ते उजेडात आणले जाणार आहे. यामध्ये सत्यशोधक, अपूर्वा, पाषाण, सरदार आणि पावशा या कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण, सामाजिक विषमतेवर प्रहार करणाऱ्या ‘वेदा आधी तू होतास’ या गाजलेल्या कविता संग्रहाची नवीन आवृत्ती त्याचबरोबर आबांनी लिहिलेले पण आजवर अप्रकाशित राहिलेले अर्धवट साहित्य, विविध दिवाळी अंकांतील दुर्मीळ कथा आणि त्यांची समग्र गौरवगाथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली जाणार आहेत. २००७ मध्ये बाबूराव बागूल यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देण्यात आला होता.
---चौकट
आबांचे विचार
तरुण पिढीपर्यंत पोचावे
२००८ मध्ये बाबूराव बागूल यांचे निधन झाल्यानंतर अत्यंयात्रेवेळी शासनाने बागूल यांच्या स्मारकाची घोषणा केली होती. त्यासाठी आडगाव येथे जागा मिळाली, परंतु ती आरक्षित असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला. विहितगाव येथे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली, तेथे अडथळा निर्माण झाल्याने स्मारकाचा प्रयत्न गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला आहे. बागूल कुटुंबीयांच्या मते, इमारत, पुतळा यापेक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोचावे. यातून सांस्कृतिक चळवळ उभी करून मानवतेकडे जाणारी चळवळ उभी राहील. त्यामुळे स्मारकाचा प्रश्न प्रलंबित राहिला तरी, विचारांची चळवळ यानिमित्ताने उभी राहणार आहे.
--- कोट
आम्हाला केवळ वीट-मातीची इमारत किंवा पुतळा नको आहे. त्यापेक्षा आबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आबांच्या साहित्याची पुनर्निर्मिती करून आम्हाला समाजात एक वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ उभी करायची आहे, जी माणसाला माणसाशी जोडेल.
-प्रा. शोभा बागुल, अध्यक्ष, बाबूराव बागूल प्रतिष्ठान