सुरक्षित रस्त्यासाठी महामोर्चा

सुरक्षित रस्त्यासाठी महामोर्चा

Published on

कोथरूड, ता. ३ ः चांदणी चौक प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटेल व विकासाची गती वाढेल, ही अपेक्षा होती. मात्र, परिसरातील रहिवाशांना असुरक्षित रस्ते, विस्कळित आणि धोकादायक वाहतूक आणि कोंडीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
याबाबत ‘वरद हाईट्‍स’मधील रहिवासी अमोल समगीर म्हणाले, ‘‘वारज्यापासून वाकडपर्यंत कोणत्याही ठिकाणी महामार्गालगत असणारे सेवा रस्ते एकेरी नाहीत; परंतु वेद भवनाशेजारी चांदणी चौकालगत असलेला सेवा रस्ता एकेरी आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी हक्काचा आणि योग्य असा एकही रस्ता नाही. आम्हालाही सुरक्षित रस्ता मिळावा. जोपर्यंत या रस्त्याबाबत मार्ग निघत नाही, तोपर्यंत महामार्गालगतचा रस्ता आम्हाला दुतर्फा वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा.’’
सिद्धार्थ पार्क सोसायटीतील रहिवासी मोहन अंतूरकर म्हणाले, ‘‘वरद कॉलनीकडे येताना वाहतूक नियंत्रक दिवे लावावेत. म्हणजे रस्ता ओलांडायला आधार मिळेल. तीव्र उतार व विजेचा डीपी असल्यामुळे गाडी वळवणे, उताराने खाली आणणे धोकादायक झाले आहे.’’ अखिल वेदभवन मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश कदम म्हणाले, ‘‘वेदभवन’च्या नागरिकांना हक्काचा रस्ता मिळाला पाहिजे, टेकडी अर्धवट फोडली, चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.’’
नागरिकांनी बाहेर पडायचे कुठून?
वेदविहार हाउसिंग सोसायटीच्या रहिवासी डॉ. मनीषा जाधव म्हणाल्या, ‘‘घरातून बाहेर पडल्यावर उजवीकडे म्हणजेच वारज्याला जायचे असेल तर ‘नो एंट्री’चा फलक आणि डावीकडून कोथरूडला जायचे असेल तरी ‘नो एंट्री’, मग नागरिकांनी बाहेर पडायचे कसे आणि कुठून? भूमिगत मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महामार्गाच्या रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून तो रस्ता दोन्ही बाजूंनी करावा. म्हणजे वेदभवन येथील नागरिकांना एक लेन वारज्याकडे जायला उपलब्ध होईल; तसेच कोथरूडकडे जाण्यासाठी एक लेन उपलब्ध करून द्यावी.’’
न्यायालयाचा आमच्या बाजूने निकाल
‘एनडीए’कडे असा दिशादर्शक फलक लावल्याने गाड्या वेदभवनकडे वळतात. नंतर त्यांना चूक लक्षात येते. येथे हा रस्ता अरुंद आहे. वाहने वेगात येत असतात. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. सर्वोच्च न्यायलयात आम्ही जो दावा दाखल केला होता, त्यामध्ये न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नसल्याने तो न्यायालयाचा अवमान झाला आहे. अवमान याचिका दाखल करण्यासाठी येणारा खर्च आमच्या आवाक्याबाहेरचा आहे. सर्वसामान्य माणूस कधीच रस्त्यावर येत नाही. परंतु असह्य झाल्यामुळे सोसायटीतील माणसे रस्त्यावर येऊन आंदोलन करत असल्याचे वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी सांगितले.
एका भुयारी मार्गाचे काम राहिले आहे. ते दोन महिन्यांत होणे अपेक्षित आहे. ते झाल्यावर दुहेरी मार्ग होईल. नागरिकांच्या काही तक्रारी महापालिकेशी निगडित आहेत. त्यांचे निराकरण महापालिकाच करू शकेल.
- भारत तोडकरी,
सल्लागार, चांदणी चौक प्रकल्प

नागरिकांच्या सूचना...
- ‘एनएचएआय’च्या सेवा रस्त्यावर आणि लगतच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत
- ‘एनएचएआय’च्या सेवा रस्त्यावर पदपथाची सोय करावी
- योग्य वाहतूक सूचना फलक लावावेत
- दुहेरी वाहतूक करावी
- अर्धवट तोडलेली टेकडी पूर्ण पाडून स्लीप रस्ता वारजेपर्यंत पूर्ण
करावा
- अर्धवट तोडलेल्या टेकडीपासून आत येणारा एक्झिट बंद करून ती वाहतूक ओएसिस हॉटेलपासून आत वळवावी


महामोर्चात सहभागी सोसायट्या

वेदभवन मंदिर, वेदविहार सोसायटी, रविराज रेसिडेन्सी, हेरंब रेसिडेन्सी, मनोहर रेसिडेन्सी-१, विश्वजित अपार्टमेंट, साई प्रसाद अपार्टमेंट, सुयश अपार्टमेंट, सिद्धार्थ पार्क-ए, मनोहर रेसिडेन्सी-२, सिद्धार्थ पार्क-बी, श्रीरंग अपार्टमेंट, गौरांग अपार्टमेंट, वेदांत सोसायटी, सिद्धार्थ पार्क-सी, श्री समर्थ अपार्टमेंट, निर्माण निसर्ग अपार्टमेंट, सद्योजत अपार्टमेंट, वेदश्री, श्री राज व्हिला, रुणवाल साधना, श्रीशा एन्क्लेव्ह, ओम रेसिडेन्सी को-ऑप. सोसायटी, श्री भारती तीर्थ कृपा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.