अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान विश्वगुरू बनवेल ः श्रीपाद नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान विश्वगुरू बनवेल ः श्रीपाद नाईक
अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान विश्वगुरू बनवेल ः श्रीपाद नाईक

अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान विश्वगुरू बनवेल ः श्रीपाद नाईक

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : ‘‘अध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून अध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि संत-महात्म्यांचा आशीर्वाद हा भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करेल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून पुण्यात आयोजित साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात नाईक बोलत होते. गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक भवनात रविवारी (ता. ५) झालेल्या या संमेलनास हरियाणा येथील महंत कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज, हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू उपस्थित होते. या प्रसंगी उद्योजक फत्तेचंद रांका, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल गायकवाड आदींची उपस्थिती होती.
कालिदास महाराज म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीराम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे. आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.’’
संमेलनात विश्वशांती महायज्ञ, सुंदरकांडाचे प्रस्तुतीकरण, भजन व प्रवचन, भंडारा, गोमाता पूजन करण्यात आले. मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक राष्ट्रीय फाउंडेशनचे लोकार्पण व संकेतस्थळाचे उद्‍घाटन झाले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अतुल भोसले, राहुल गोसावी मित्र परिवार, महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान, सर्वात्मक महारुद्र परिवार, मैत्री प्रतिष्ठान, शिवाजी करंजुले, नंदकिशोर शहाडे, ललित तिंडे, भरत मिसाळ, डॉ. इंद्रजित यादव, ॲड. महेंद्र दलालकर यांनी परिश्रम घेतले.