Neelam Gorhe
Neelam Gorhesakal

Neelam Gorhe : गैरसमज पसरवून टोकाचा निष्कर्ष नको ; डॉ. गोऱ्हे

‘भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास भाग पाडले, असे चित्र तयार केले जात आहे, परंतु असे गैरसमज पसरवून टोकाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतात.

पुणे : ‘भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास भाग पाडले, असे चित्र तयार केले जात आहे, परंतु असे गैरसमज पसरवून टोकाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच लढतींचे खरे चित्र स्पष्ट होईल,’ असे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमधील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही. स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार पक्षप्रमुखांकडून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. पक्षांतर्गत निर्णयावर मी भाष्य करणे योग्य नाही. आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार तयारीला लागलो आहोत. महायुती म्हणजे एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरूप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आमच्यात मनभेद झाले आहेत असे नाही.’’

पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप आमच्याकडे अजून कुणीही कुणावरही केला नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
भाजपने उदयनराजे यांना दिल्लीत ताटकळत ठेवल्याच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना समान अधिकार दिले आहेत. छत्रपती उदयनराजे यांचा कमी सन्मान होईल असे समजण्याचे कारण नाही. कारण ते जनतेच्या प्रश्नांसाठीच निवडणुकीत उतरत आहेत.’’

पुण्यातील लढत दुहेरी होईल
लोकसभा निवडणुकीत पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे रिंगणात उतरल्याने तिरंगी लढतीची चर्चा सुरु आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरपूर मेहनत घेतात. परंतु मागील काही निवडणुकांतील अनुभव पाहता त्यांचा आधीचा उत्साह काही कारणामुळे मतदानापर्यंत कायम राहत नाही, असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे पुण्याची निवडणूक मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी दुहेरी होईल.’’

गरज असेल तेथे प्रचाराला जाईन
‘अजित पवार यांचे जिल्ह्यातील काम चांगले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री आहे. सामाजिक संस्था आणि बचत गटांच्या माध्यमातून यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतल्याने आमचा जनसंपर्क चांगला आहे. प्रचारासाठी ज्या ठिकाणी माझी गरज असेल तेथे मी जाईन,’ असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

तरीही आढळराव पाटील महायुतीतच
एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाची हानी होतच असते. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना सोडून गेल्याने पक्षाची हानी होईल, परंतु ते महायुतीतील दुसऱ्या घटक पक्षातच गेले आहेत. फक्त ते ताटातून वाटीत गेले आहेत, अशी प्रतिक्रिया डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com