
निवडणूक सहानुभूतीवर नाही, विकासावर ः अजित पवार
पुणे, ता. ९ ः कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांची पोटनिवडणूक सहानुभूतीवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे, तसेच पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी चिंचवडला येऊन कसब्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. त्यात ते पवार बोलत होते. आमदार चेतन तुपे व सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रदीप गारटकर, अजित गव्हाणे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘शिंदे-फडणवीस सरकारला निवडणूक आयोग, न्यायालयाने कोणतीही मान्यता न दिल्यामुळे हे सरकार घटनाबाह्यच आहे. त्यांच्या विरोधात नाराजी असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता चिंचवड व कसबा या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये या गद्दार सरकारला त्यांची जागा दाखवून द्या. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भाजप काहीही करू शकते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. विजय मिळविण्यासाठी कुठेही कमी पडू नका.’’
नागरिकांशी साहेबांसारखे बोला
पोटनिवडणुकीत नागरिकांशी बोलताना माझ्यासारखे कडक भाषेत बोलू नका, शरद पवारसाहेब कसे समजून सांगतात, त्याप्रमाणे बोला. मतदार नाराज होणार नाही, याची दक्षताही बाळगावी, असे सांगताच कार्यकर्त्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले. तसेच महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, असेही पवार सांगितले.