
...आपको देखके मेरी थकान दूर हो गयी! काश्मिरी विद्यार्थिनींशी गृहमंत्री अमित शहा यांचा संवाद
पुणे, ता. १८ : नागपूरहून पुण्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर दिवसभर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात झालेले विविध प्रकारचे कार्यक्रम, त्यासाठी दिवसभर सुरू असलेला प्रवास. या सगळ्या घडामोडींमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना काही प्रमाणात थकवा आला, पण शहा यांनी दिवसाच्या शेवटी काश्मिरी विद्यार्थिनींची भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणा संवाद साधला आणि क्षणार्धात ते ताजेतवाने झाले, उत्साही विद्यार्थिनींना पाहून शहा यांच्या तोंडून शब्द निघाले, ‘‘आपको देखके मेरी थकान दूर हो गयी!’’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सरहद या संस्थेच्यावतीने संस्थेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या जम्मू व काश्मीर येथील विद्यार्थिनींसमवेत गृहमंत्री अमित शहा यांच्या संवादाच्या कार्यक्रमाचे हॉटेल मेरिएट येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, शैलेश वाडेकर, सुषमा नहार आदी या वेळी उपस्थित होते.
‘‘तुम्हाला भेटून मलाच आनंद झाला आहे. तुम्ही पुण्यात शिक्षण घेत असताना तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद लपून राहत नाही. सरहद या संस्थेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. जम्मू व काश्मीरमधील मुला-मुलींच्या शिक्षण, रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्हीही चांगले शिक्षण घ्या आणि मोठे व्हा,’’ अशा शब्दांत शहा यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. तर ‘‘आम्हाला शिक्षण, रोजगारासाठी बाहेर पडायचे आहे. आमच्यासाठी चांगल्या शिक्षणाची, हातांना रोजगार देण्याची व्यवस्था करावी,’’ असे म्हणत विद्यार्थिनींनी शहा यांच्याशी थेट संवाद साधला. थेट देशाच्या गृहमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी संवाद साधता आल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरही वेगळा आनंद या वेळी दिसून आला.
२५६५३