
नामांतरात स्थानिकांची भावना महत्त्वाची ः विखे पाटील
पुणे, ता. ३ ः अहमदनगरच्या नामांतराबाबत बाहेरच्या लोकांनी भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. गोपीचंद पडळकर आमचे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलतो असे सांगत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नामांतराच्या विषयावर मत व्यक्त केले.
आमदार पडळकर यांनी विधान परिषदेत अहमदनगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे अशी मागणी लक्षवेधी मांडून केली होती. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार त्यासाठी सकारात्मक असल्याचे उत्तर दिले होते. पण त्यानंतर नगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पुण्यात पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संवाद साधला असता विखे पाटील म्हणाले, ‘‘अहमदनगरच्या नामांतराचा अंतिम निर्णय झालेला नाही. अहमदनगर नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पर्यटन, औद्योगिक विकास असे अनेक विषय आहेत. बाहेरच्या लोकांनी येऊन यावर भाष्य करण्यापेक्षा स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. जिल्ह्यातील विकासासाठी एकत्रित येऊन मुद्दे मांडले पाहिजेत.’’