सामाजिक संस्थांच्या मदतीने पुरस्कार्थींचा शोध

सामाजिक संस्थांच्या मदतीने पुरस्कार्थींचा शोध

पुणे, ता. ९ : ‘‘पूर्वीपासूनच भटक्‍या, विमुक्त जाती जमातीसारख्या काही समाजांना शिक्षण व मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवले होते. काहींनी मिळालेल्या संधीचे सोने केले, समाजातील अशा अनेकांना पद्मश्री सन्मानाने गौरविले आहे. मोदी सरकारने सन्मानासाठी ऑनलाइन अर्ज मागवून सामाजिक संस्थांची मदत घेत चांगल्या लोकांचा शोध घेण्यास प्राधान्य दिले.’’ असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

गोंधळी व भटक्‍या विमुक्त जाती जमाती विकास संघ व अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेतर्फे कृष्णसुंदर गार्डन येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरी सत्कार व वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, संघटनेचे अध्यक्ष परेश गरुड, पवन अटक, ॲड. मुकुंद यदमळ आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकू इदाते, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, परशुराम गंगावणे, ज्येष्ठ लोकसाहित्यकार डॉ. प्रभाकर मांडे, पांडुरंग घोटकर गुरुजी, ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या प्रतिक्षा बागडी, सुधाकर गीते यांचा सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, ‘‘स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जाती व्यवस्थेतून बाहेर पडलो नाही. पंतप्रधान पदी नियुक्ती झाल्यापासून मोदी यांनी विविध इतर मागास प्रवर्गातील २७ जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले. डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच जाती-जमाती, उच-नीच हा भेदभाव नाकारण्याचा विचार दिला. मोदी यांनी हाच विचार पुढे नेण्याचे काम केले आहे.’’

इदाते म्हणाले, ‘‘भटक्‍या विमुक्त जाती जमातीमधील लोकांच्या असंख्य प्रश्‍नांची आम्ही माहिती घेत अभ्यास केला. त्यानंतर ‘इदाते समिती’चा अहवाल राज्य व केंद्र सरकारला दिला. राज्य सरकारने तत्काळ विविध संस्था स्थापन करून काम सुरू केले, तर पंतप्रधान मोदी यांनी समितीच्या अहवालाची दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. मात्र आत्तापर्यंत कोणीही त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले नाही. फक्त प्रश्न निर्माण करून उपयोग नाही, तर प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचे काम आपण केले पाहिजे.’’

कर्तृत्वाची नोंद नाही!
प्रभुणे म्हणाले, ‘‘वयाच्या ४० वर्षी मी भटक्‍या, विमुक्त समाजासाठी काम सुरू केले. इस्लामी आक्रमणानंतरच नालंदा सारखी मोठी शिक्षण संस्था लोप पावली. परकीय आक्रमण काळात ही भटक्‍या विमुक्तांनी मोठा लढा दिला. मात्र त्यांच्या कर्तृत्वाची नोंद आपल्या इतिहासाने कधीच घेतली नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com