उन्हाळी हंगामात पर्यटनाची ‘भरारी’

उन्हाळी हंगामात पर्यटनाची ‘भरारी’

पुणे, ता. १० ः पर्यटनाचा हक्काचा हंगाम असणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे बेत आता निश्चित झाले आहेत. नागरिक पर्यटनासाठी प्रचंड उत्साही असल्याने पर्यटन व्यावसायिकांच्या जवळपास सर्वच टूर ‘फुल’ झाल्या आहेत. देशांतर्गत पर्यटनात जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत व ईशान्य भारताला पसंती मिळत आहे. तर, आंतरराष्ट्रीय पर्यटनात तीन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने खुल्या झालेल्या युरोपमध्ये फिरायला जाण्याची उत्सुकता दिसत आहे.

एप्रिल-मे महिन्यात शाळेला सुट्ट्या लागल्यावर अनेक नागरिक सहकुटुंब फिरायला जाण्याचे बेत आखतात. त्यामुळे हा काळ पर्यटन व्यवसायासाठी सर्वाधिक बहराचा असतो. मागील वर्षी उन्हाळी हंगामात देशांतर्गत पर्यटन सुरू होते. मात्र, कोरोनाच्या सावटातून सावरत असल्याने युरोपातील देशांमध्ये फिरायला जाण्यास अडचणी येत होत्या. यंदा मात्र या अडचणी दूर झाल्याने पर्यटकांना तेथील ‘प्रवेश’ खुला झाला आहे. युरोपातील टूरसाठी गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासूनच चौकशीला आणि आरक्षणाला प्रारंभ झाला होता. येथील फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया हे देश पर्यटकांचे आवडते देश आहेत. त्या व्यतिरिक्त दुबई हे नेहमीचे पसंतीचे ठिकाण, तसेच थायलंड, सिंगापूर या ठिकाणांनाही चांगला प्रतिसाद आहे. अमेरिका मात्र या हंगामातही दुरापास्तच आहे.

एप्रिल-मे महिन्यात देशात उन्हाळा असल्याने तुलनेने थंड असलेल्या उत्तर भारतात फिरायला जाण्याचे प्रमाण अधिक असते. यावर्षीही देशांतर्गत पर्यटनात काश्मीरला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश, सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक यांसारख्या ईशान्य भारतातील ठिकाणांना पसंती मिळते आहे.

चारधामला प्रतिसाद
यंदा देशांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक स्थळांना लक्षणीय प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण पर्यटन व्यावसायिकांनी नोंदवले. चारधामच्या यात्रेसाठी नागरिक मोठ्या संख्येने उत्सुक आहेत. त्यासह अयोध्येला जाऊन राममंदिर पाहण्याचा, वाराणसीला जाऊन गंगा नदी पाहण्याचा कलही यंदा दिसून येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

दुबईत दिसतो आहे बदल
एप्रिल महिन्यात दुबईत जास्त तापमान असेल, असे आपल्याला वाटते. मात्र, आपल्याकडील जानेवारी-फेब्रुवारीप्रमाणे तिथे आत्ता सुखद हवामान आहे. त्यामुळे दुबई पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. कोरोनामध्ये निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेतल्याने हा सकारात्मक बदल झाला, असे केसरी टूर्सच्या झेलम चौबळ यांनी सांगितले.

ंआंतरराष्ट्रीय पर्यटनात गतवर्षीपेक्षा ६० ते ७० टक्के अधिक तर, देशांतर्गत पर्यटनात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. दर्जेदार सोयीसुविधा मिळाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक तेवढा, किंबहुना अधिकचा खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे.
- अखिलेश जोशी, गिरिकंद ट्रॅव्हल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com