शहराच्या विविध भागात तीन दिवस पाणी टंचाई 

रविवारी सुरळीत होण्याची शक्यता; २० ठिकाणी वॉल्व्ह बदलणे, जलवाहिनी दुरुस्त काम सूरू

शहराच्या विविध भागात तीन दिवस पाणी टंचाई रविवारी सुरळीत होण्याची शक्यता; २० ठिकाणी वॉल्व्ह बदलणे, जलवाहिनी दुरुस्त काम सूरू

पुणे, ता. २९ ः पुणे पालिकेने शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २७) बंद ठेवला होता. पण, त्यानंतर पुढील दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २८) शहराच्या अनेक भागीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. महापालिकेकडे टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. मात्र, भर उन्हाळ्यात सलग तीन दिवस पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले.

पाणीपुरवठा विभागाला शहराच्या विविध भागात देखभाल दुरुस्तीची अनेक कामे करायची होती. धार्मिक सण असल्याने या काळात पाणी बंद होऊ नये, यामुळे प्रशासनाने हीकामे एक महिना पुढे ढकलली होती. त्यानुसार गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करून सुमारे २० ठिकाणी वॉल्व्ह बदलणे, जलवाहिनी दुरुस्त करणे जलवाहिनी स्थलांतर करणे, अशी कामे हाती घेतली.

या भागात न आलेले पाणी
शुक्रवारी
- कोथरूड, बाणेर,
- बालेवाडी, मॉडेल कॉलनी,
- प्रभात रस्ता शिवाजीनगर,
- कोंढवा, वानवडी,
- कात्रज, आंबेगाव,
- येरवडा, हडपसर, मुंढवा

शनिवारी
- बाणेर,
-बालेवाडी,
-कोंढवा,
-कात्रज

टँकरभरण्यासाठीही पाणी नाही
चतुःश्रृंगी टाकीवर अवलंबून असलेल्या भागात शनिवारीही पाणी नव्हते. अनेक नागरिकांनी दुपारी टँकरसाठी फोन केले असता टाकीवर पाणी आले नाही असे उत्तर दिले. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला.

गुरुवारी पाणी बंद करून शहरात सुमारे २० ठिकाणी दुरुस्तीचे कामे केली. ही कामे गुरुवारी रात्री पूर्ण होणे अपेक्षीत होते, पण शुक्रवारी पहाटेपर्यंत कामे सुरू होती. त्यामुळे टाक्या भरून सर्व भागात पाणी पुरविण्यासाठी उशीर झाला. शुक्रवारी नागरिकांच्या तक्रारी होत्या, पण शनिवारी बहुतांश भागात पाणी गेले आहे. रविवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल.’’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

वारजे येथे महत्त्वाचे काम पूर्ण
वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून कोथरूड, येरवडा, बाणेर बालेवाडी, शिवाजीनगरचा काही भाग येथे पाणी जाते. वारजेवरून होळकर पूल येथील टाकीवर जी जलवाहिनी जाते तेथे वॉल्व्ह खराब झाला होता. त्यामुळे होळकर पूल टाकीवर काही काम करायचे असले की वारजे येथून पाणी बंद करावे लागत होते. त्यामुळे त्याचा फटका कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागाला बसत होता. मात्र,आता येथे स्वतंत्र वॉल्व्ह बसविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच येरवडा येथे मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी स्थलांतरित केली आहे, असे पावसकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com