education
educationsakal

Education : शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ!

रखडलेली शिक्षक भरती आणि वाढता भ्रष्टाचार पाहता शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे.
Published on

पुणे - रखडलेली शिक्षक भरती आणि वाढता भ्रष्टाचार पाहता शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील प्रवेशांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, शिक्षणशास्त्र महाविद्यालये बंद पडण्याची वेळ आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या विविध शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांतील प्रवेशाच्या आकडेवारीतून भयानक वास्तव समोर येत आहे. बीएड-एमएड या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला राज्यभरातून फक्त २६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यातील फक्त ८३ विद्यार्थ्यांनी आजवर प्रवेश निश्चित केले आहे.

तर दुसरीकडे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे डी. एल. एड.(डीएड) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा डीएड प्रवेशासाठी राज्यातील ३१ हजार १०७ जागांसाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे.

ही आहेत कारणे

- शाश्वत विकासाची पायाभरणी करणाऱ्या शिक्षकी पेशाकडे प्रचंड अनास्थेने पाहिले जात आहे.

- सरकारी धोरणातील उदासीनता आणि बेरोजगारीचे संकट.

- गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही.

- संच मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती राबविली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी जाहीर करण्यात आले.

- अद्याप संच मान्यतेच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही.

- त्यामुळे अजूनही शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारकडून ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

प्रवेशाची सद्य-स्थिती

अभ्यासक्रमाचे नाव - अर्जदार - प्रवेश निश्चित करणारे

१) बीए किंवा बीएस्सी बीएड (चार वर्षाचा अभ्यासक्रम) - ६२४ - २३७

२) बीएड-एमएड - २६० - ८३

३) एमएड - ४१७ - १४९

४) बीएड - १३३४६ - ६२६३

(आकडेवारी जून अखेरपर्यंतची)

शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करणारे सुमारे दोन लाख विद्यार्थी राज्यात आहे. सरकारने मागील दहा वर्षांपासून शिक्षकभरतीच केली नाही. उलट अधिक किचकट प्रक्रिया आणत भरती लांबवत असून, पर्यायाने शिक्षणशास्त्र विषयात शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. याचा थेट फटका ग्रामिण भागांतील शाळांना बसत आहे.

- अंबादास वाजे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षणाकडे सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. सुमारे १२ वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरती बंद आहे. जर नोकरीच मिळत नसेल, तर कशाला विद्यार्थी शिक्षणशास्त्राला प्रवेश घेतील. सरकारने तातडीने नियमित शिक्षक भरती करायला हवी. पर्यायाने सर्वोत्तम विद्यार्थी शिक्षणशास्त्राचा अभ्यास करतील.

- मधुकर काठाळे, राज्य अध्यक्ष, शिक्षक संघटना समन्वय समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.