पावसाळ्यातही ‘पीएमपी’ ब्रेकडाउनचे रडणे सुरूच

पावसाळ्यातही ‘पीएमपी’ ब्रेकडाउनचे रडणे सुरूच

Published on

पुणे, ता. ६ ः पावसाळा सुरू झाला की बसथांब्यावर उभा असलेला प्रवासी असो की बसमधून प्रवास करणारा. त्याच्या नशिबी गैरसोय ही आलेलीच. कधी तांत्रिक कारणांमुळे, तर कधी टायर पंक्चर झाल्याने ‘पीएमपी’च्या दिवसाला सुमारे ४० बस रस्त्यातच बंद पडत आहे. आयुर्मान संपलेल्या बस सेवेत धावत असल्याने ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. मात्र याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना पावसात पायपीट करावी लागत आहे.
‘पीएमपी’च्या सुमारे १६५० बस दररोज पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या क्षेत्रात धावतात. यातून सरासरी १२ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. यातल्या सुमारे ४० विविध मार्गांवरच्या बस बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यातच बस बंद पडल्याने वाहतुकीलादेखील मोठा अडथळा ठरत आहे. यात ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. ठेकेदारांच्या २२, तर ‘पीएमपी’च्या मालकीच्या १८ बस बंद पडत आहे. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. दरम्यानच्या काळात माजी अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी बसच्या देखभाल व दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केल्याने ब्रेक डाउनचे प्रमाण कमी झाले होते. पण आता त्याचे प्रमाण पुन्हा वाढत आहे, अशी माहिती ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर
‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ३५० बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यांना १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तर सुमारे २५० बसचे आयुर्मान येत्या मार्च महिन्यात कालावधी संपत आहे. आधीच बसची संख्या कमी आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन बस सेवेच्या बाहेर न काढताच तशाच सुरू ठेवत आहे. परिणामी बसचे ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. नवीन बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल झाल्यावरच आयुर्मान संपलेल्या बस प्रवासी सेवेतून बाहेर होतील. तोपर्यंत प्रवाशांच्या नशिबी कायम राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.