आरोग्य खात्याच्या रिक्त जागांची होणार भरती

आरोग्य खात्याच्या रिक्त जागांची होणार भरती

आरोग्य परिमंडळांची संख्या २० पर्यंत वाढविणार
डॉ. तानाजी सावंत यांची माहिती; खात्याची फेररचना होणार

पुणे, ता. २१ ः सार्वजनिक आरोग्य विभागातील परिमंडळांची संख्या आठवरून वीसपर्यंत वाढविण्यात येईल. रुग्णसेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी खात्याची फेररचना करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
सध्या पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, लातुर, अकोला आणि नागपूर अशी आठ परिमंडळे आहेत. उपसंचालक दर्जाचा अधिकारी प्रत्येक परिमंडळाचा प्रमुख आहे. प्रत्येक परिमंडळात तीन ते चार जिल्हे आहेत. राज्यातील वाढलेली लोकसंख्या आणि कामाची व्याप्ती यामुळे या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारण्यात आले. त्या आधारे आठ परिमंडळाचे विभाजन करून त्यातून २० परिमंडळांची निर्मिती करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. परिमंडळाचे विभाजन केल्यास अधिकारी कार्यक्षमतेने काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात स्वातंत्र्य दिनापासून मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विषयी ते म्हणाले, ‘‘आरोग्य खात्यातर्फे पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतून राज्यात ६० ते ७० कोटी रुपये संकलित होत होते. पण त्यासाठी खात्याची मोठी यंत्रणा राबवली जात होती. मनुष्यबळ आणि यंत्रणेवरील खर्च १२० कोटी रुपयांच्या घरात होता. आता आरोग्य सेवा मोफत केल्याने यंत्रणेवरील खर्च कमी झाला. त्याच वेळी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराला येणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे.

रिक्त पदे भरणार
संचालक (१) आणि संचालक (२) यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या पदांचा कार्यभार अद्यापपर्यंत कोणाकडे दिलेली नाही. या संदर्भातील प्रश्नावर डॉ. सावंत म्हणाले, ‘‘या पदांवर पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकारी नियुक्त करण्यात येतील. तसेच गेल्या काही वर्षांपासून रखडलेली बिंदुनामावलीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येईल. राज्य लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावरही भर दिला आहे. रिक्त पदे पारदर्शक पद्धतीने भरण्यात येतील.‘‘
---

बालमृत्यू रोखण्याला प्राधान्य
राज्यातील आदिवासी भागात पावसाळ्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण वाढते. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींपर्यंत आरोग्याची यंत्रणा पोचू शकत नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तेथील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. दुचाकी रुग्णवाहिकांचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तेथील बालकांचे नियमित ‘ट्रॅकिंग'' करण्याची यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू यांचे प्रमाण कमी करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात येईल, अशी माहितीही डॉ. सावंत यांनी दिली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com